RSS

Friday, January 13, 2012

मिऱ्या डोंगर


 खरं तर ट्रेकर या जातीतली मी कधीच नव्हते किंवा नाही..आपला पिंड निवांत चालायचा आणि मुख्य पक्षी (आणि जमल्यास प्राणी) पाहायला शिकायचं थोडक्यात ट्रेल करायची आवड..पण तरी एक दिवस असा येतो की तुम्ही अट्टल ट्रेकर बरोबर कुठे तरी जाता..ते ठिकाण काही भव्य दिव्य असायला हवं असण जरुरीचं नाही पण तो प्रवास, ती झिंग एकदा अनुभवली की मग अरे इतकी वर्ष आपण हे का नाही केलं बरं असं लगेच वाटतं...आणि मग आपल्याला वाटतं की हे सगळं आपल्याला कायम लक्षात राहील...आणि तिथेच माझ्यासारख्यांच गणित चुकतं..
हम्म म्हणजे  काय आहे या ब्लॉगचं पुनरुज्जीवन केल्यापासून मला माझा पहिला ट्रेक याविषयी लिहायचं आहे आणि बरेच दिवस मला त्या जागेचं नाव आठवत नव्हतं..मग जागेचं नाव आठवलं तर तिथे नक्की कसे गेलो ते आठवत नव्हत..या ना त्या कारणाने ते लिहिणं राहून जात होतं..मग आता २०१२ सुरु झालंय तर जस आठवेल तस पण लिहायचं असा विचार करून बसलेच आहे त्यामुळे यातल्या माहितीत गल्लत व्हायची शक्यता आहे हे आधीच नमूद करायला हव...
तर माझी कामावरची एक मैत्रीण रोहिणी, जिला खर तर अट्टल ट्रेकरच म्हटलं पाहिजे तिला एकदा मी माझ्याबरोबर बीएनएचएसच्या ट्रेलला नेलं होतं त्यानंतर ती तिच्या एका ट्रेकग्रुप बरोबर कुठेतरी जाणार होती त्यात तिने मलाही आमंत्रण दिलं...शनिवारी रात्री प्रवास आणि रविवारी ट्रेक करून परत असा माझ्या शब्दात धाडसी कार्यक्रम होता....आणि जागा होती मिऱ्या डोंगर...
आम्ही सर्व दादर स्टेशनला भेटून रात्रीच्या गाडीने पेणला जाणार होतो आणि मग तिथून सकाळी दुसरी लालडब्बा पकडून पायथ्याच्या गावाशी. रोहिणीचा ग्रुप तसा मोठा आणि मोठ्या वयाच्या लोकांचा होता पण मंडळी सगळी बोलायला मोकळी ढाकळी होती त्यामुळे त्यांची ओळख होऊन गप्पांचा फड रंगायला बसमध्ये वेळ लागला नाही...आणि खर तर नन्तर मी जे काही थोडे फार ट्रेक केले त्यातले या ग्रुपबरोबर जास्तच होते त्यामुळे आमच सूत पहिल्या ट्रेकलाच जुळलं असं म्हणायला हरकत नाही..
आता हे पायथ्याच गाव नक्की कुठल होत ते काही मला आठवत नाही पण एका घरात जेवण सांगून तिथलाच वाटाड्या मदतीला घेऊन आम्ही निघालो होतो...मला आता नक्की महिना पण आठवत नाही पण भर पावसात नक्कीच नव्हतो बहुदा पीक कापणीच्या सुमारास जेव्हा रान पिवळ झालेलं असत ते दिवस होते..आमच्या वाटाड्याला आम्ही विचारल की मिऱ्या डोंगर कुठेशी? तर ते म्हणतात हा काय इथं...आणि सरळ वर बोट दाखवलं...आम्ही त्या पिवळ्या उंच गवतातून किती उंच असेल याचा अंदाज  घ्यायच्या आत आमचे मावले एक एक करून गड काबीज करयच्या वाटेवर लागले पण होते...नशिबाने खाली येऊन जेवायचं होत त्यामुळे सर्वामध्ये एका sack मध्ये पाणी आणि पाकीट ठेवून ती एका सरांकडे दिल्यामुळे आम्हाला सड्यासुट्ट्या हाताने फक्त चढाई करायची होती...बाकी ट्रेकला जाताना मौल्यवान काही नेऊ नये हा नियम तेव्हापासून होताच त्यामुळे त्याची चिंता नव्हती..मला वाटतं कुणाचकडे कॅमेरा नव्हतं त्यामुळे ते धूडही नव्हत...
पण मी आणि माझी आणखी एक मैत्रीण आम्ही आयुष्यात पहिल्यांदी ट्रेक करत होतो..याआधी मला वाटत  विरारची जीवदानी आणि मळवलीची कार्ल्याची लेणी सोडून कुठे आम्ही चढलो नसू..आणि तिथे तर काय पायऱ्या त्यामुळे तस सोप..पण इथे आमचे वाटाडे काका हा काय गड म्हणले तो चढताना जो घाम फुटत होता काही सांगायची सोय नाही...आणि बाकीचे तर पटापट चढत होते त्यामुळे आणखी टेन्शन....कुठे थांबायचं तर तस काही सपाट दिसत नव्हत...म्हणून मग ते नेतात तसे चढत राहिलो..आणि (एकदाचे) पोहोचलो...मी आणि माझी मैत्रीण आम्ही नक्की किती वेळ धापा टाकत होतो माहित नाही पण वरचा गार वारा खाऊन जरा हुश झाल्यावर आपण कुठून आलो हे पहायचा अंदाज घेतला आणि एकदम लक्षात आलं की वाटाडे काकांनी आम्हाला बरोबर सरळसोट म्हणजे नव्वद अंशात चढवल होत...बापरे..सहीच होते ते...आणि मग आम्हाला म्हणतात, "बघा आणलं ना बिगी बिगी??आता बगा काय बगायचं ते आणि चला खाली..उन उन जेवण वाट पाहत असेल...."
धन्य...त्यांना बाकीचे पण साष्टांग दंडवत घालणार होते पण आम्हाला उतरून त्यांच्याच घरी जेवून जायचं होतं...म्हणून तो विचार रद्द केला गेला असावा..काहीही असो एकदा गडावर चढल्यावर असल्या गोष्टींची चिंता करायच्या ऐवजी मस्त उनाड वारा पिऊन घेतला आणि वरून दिसणारे इतर डोंगरकडे, खालचे रानोमाळ न्याहाळत बसलो..मला वाटत वर कुठेतरी पाण्याचा एक हौदसारखा होता पण बाकी काही विशेष पहिल्याच आठवत नाहीये...आता पुन्हा ते तसेच उतरवणार का याच एक कोड होताच पण आमची चढतानाची फे फे बघून त्यांनी उतरण्याचा मार्ग आम्हाला झेपेल असा निवडला होता..खाली यायला फार वेळ पण लागला नाही कारण आम्ही अक्षरश दुपारच्या जेवणाला थोडच उशीरा खाली पोहोचलो होतो आणि ते आवश्यक पण होत कारण पुन्हा तिथून मुंबईचा पल्ला होताच...
या ट्रेकमधल्या खूप गोष्टी मी विसरले आहे तरी त्या काकुनी बनवलेलं ते चविष्ट जेवण, पानात अगदी पापड लोणच्यापासून सर्व काही आणि माझी आवडती वालाची उसळ हे मात्र फार फार लक्षात राहील आहे...जाता जाता या ग्रुपमधले सर्व शाकाहारी असल्याने यांच्याबरोबर मी ट्रेकला कधी नॉनवेज खाल्ल्याच आठवत नाही..पण इतक सुरेख शाकाहारी गरम गरम जेवण असेल तर उभा कडा चढायलाच काय उतरायला  पण मी पुन्हा तयार होईन...ट्रेकिंगची आवड निर्माण व्ह्यायला मिऱ्या डोंगरावरून दिसलेली दृश्य, तिथला उनाड वारा जितकं कारणीभूत आहे तसच त्या गडाच्या पायथ्याशी माफक दरात जेवलेल ते सुग्रास अन्नही तितकच कारणीभूत आहे असं आता ही पोस्ट लिहिताना मला वाटत...:)