RSS

Sunday, November 13, 2011

वारी सुपे रेहकुरीची....

मालवणला जाऊन आल्यावर आमच्या ग्रुपचं मुळातलं भटकंतीचं वेड जरा जास्तच वाढलं..किंवा दुसर्‍या शब्दात आता मुंबईच्या बाहेर जावं असं जरा जास्तीच वाटायला लागलं..तर मालवण नंतर लगेच म्हणजे साधारण तीन-चार महिन्यातच आम्ही पुण्यातल्या सुपे आणि रेहकुरीला जायचा प्लान आखला.

सुप्याची साधारण माहिती एक-दोघांना होती आणि रेहकुरीला मयुरेश्वर अभयारण्यात राहायची सोय आहे त्याची माहिती आणि बुकिंग करुन मालवणला केली होती तीच बस करुन जायचं ठरलं. फ़क्त यावेळी मागच्यासारखी खोगीरभरती केली नाही. कारण एक म्हणजे अशी अनोळखी माणसं जास्त आली की एकमेकांबद्दलचा कंफ़र्ट अजुन निर्माण न झाल्याने थोडी मजा कमी होते आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जंगल भटकंतीला जायचं तर तोंड गप्प ठेवणारी माणसं हवीत; त्यामुळे मग माहितीतलीच थोडी असली तरी चालेल; शिवाय मालवण इतकं अंतर नव्हतं आणि एकच रात्रीचा प्रश्न होता मग खर्चही वाटून घेतला तरी परवडण्यासारखा होता.

एका सुट्टीच्या शनिवारी सकाळी लवकर निघुन पुण्याहुन पहिले सुप्याला थांबायचं आणि मग पुढे रेहकुरीला राहायचं. सकाळी पहाटे तिथे पक्षीनिरिक्षण करुन मग दुपारी परतीला लागलं तरी चालेल असा छोटेखानी बेत होता.

मी स्वतः या दोन्ही जागी कधीच गेले नव्हते त्यामुळे पहिलटकरणीसारखं जे होईल ते पाहायचं, जमेल तसं निसर्गसौंदर्य डोळ्यात साठवायचं,खूप पक्षी पाहायचे,शिकायचं हेच डोक्यात होतं..आणि खरंच त्यासाठी सुर्वणसंधी होती..मला वाटतं ऑगस्टमध्ये आम्ही गेलो होतो त्यामुळे तसा पावसाचा थोडाफ़ार इफ़ेक्ट होताच.

सुप्याला जवळजवळ धावता दौरा होता.पण एकदा त्या अभयारण्याच्या जागेत शिरलो आणि आयुष्यातले पहिलेच चिंकारा उर्फ़ गझेल टणटण उड्या मारत जाताना पाहुन सगळ्यांचाच उत्साह एकदम वाढला. याआधी गझेल म्हटलं म्हणजे मला फ़क्त डिस्कव्हरी चॅनेलवरचं टिपिकल वाघ किंवा इतर प्राण्यांनी शिकार करताना दाखवलेला सीनच आठवे. आज ते प्रत्यक्ष समोर पाहुन मात्र भान हरपलं. हा प्राणी इतका सुंदर, नाजुक आणि चपळ आहे की पूर्ण कळप दौडत असताना नजर हटत नाही. सुप्याला एका मचाणापाशी आम्ही थोडावेळ थांबलो. तिथे आणखी काय पाहिलं ते मला आता अजीबात आठवत नाही इतकं सारं चिंकारामय झालं होतं.

जास्त न थांबण्याचं कारण मयुरेश्वर अभयारण्याला वेळेवर पोहोचुन रात्र पडायच्या आधी तिथल्या जंगलात पण एक चक्कर मारायची होती. शिवाय तिथल्या फ़ॉरेस्ट डिपार्टमेंटचा माणूस फ़ार संध्याकाळ झाली आणि कुठे गेला तर आमची राहायची पंचाईत झाली असती. रेहकुरीचं हे अभयारण्य खास प्रसिद्ध आहे ते म्हणजे काळवीटांसाठी. सुपे आणि रेहकुरी याठिकाणच्या अभयारण्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे घनगर्द झाडी नाही. सगळ्या खुरट्या काटेरी बाभळीसारख्या झाडी त्यामुळे हे जंगल आहे हे खास सांगावं लागतं. अशा ठिकाणी राहणार्‍या प्राण्यांना आणि पक्ष्यांना तिथेच कॅमोफ़्लाज होता येणं हे एकंच संरक्षण निसर्गाने त्यांना दिलंय. पण अर्थात मानव नावाच्या अति हुशार प्राण्यांपासुन बचाव करायला हे अर्थातच अपुरं पडतं आणि निव्वळ अभयारण्य केली म्हणून हे प्राणी-पक्षी वाचतात असंही नाही. असो..

तर रेहकुरीला आम्ही गेलो तेव्हा तरी काळवीटं भरपूर होती. आम्ही मुख्य गेटवर पोहोचायच्या आधीच एका शेतात काळवीटांचा एक कळप चरताना आम्हाला दिसला. फ़क्त उशीर होईल म्हणून थांबायला मात्र आम्हाला वेळ नव्हता. ही अशी शेताची नुकसानी झाल्यामुळे मारण्यात आलेल्या काळवीटांची संख्याही लक्षणीय़ आहे असं आम्हाला फ़ॉरेस्ट ऑफ़िसरशी बोलताना कळलं.

मुख्य गेटपाशी अभयारण्याचा बोर्ड आहे आणि एक दोन खोल्यांसारखं फ़ॉरेस्ट गेस्ट हाउस होतं असं मला वाटतं. आम्ही त्या फ़ॉरेस्ट ऑफ़िसरकाकांना रात्रीचं जेवण आणि सकाळचा नाश्ता याबद्द्ल आधीच सांगुन ठेवलं. पुन्हा गावात जाउन काहीतरी शोधण्यासारखं एक्सायटिंग वाटत नव्हतं आणि हाताशी असलेला वेळ जंगलासाठी ठेवावा असं जास्त वाटत होतं. अजून सूर्यास्त झाला नव्हता त्यामुळे आतमध्ये एक चक्कर मारायची आम्हाला परवानगी होती. मग जास्त वेळ न दवडता आम्ही आपापल्या दुर्बिणी घेऊन आत जाणार्‍या पायवाटेने चालायला सुरुवात केली.

आज प्राणी दिसायचं आमचं नशीब इतकं जोरावर होतं की आम्हाला जास्त आत जावंही लागलं नाही. काटेरी झाडांच्या मागेच काळवीटांचा एक कळप शांतपणे चरत होता. त्यात चांगली शिंगं असणारे नरही होते आणि काही छोटी पिल्लंही होती. आम्हाला त्यांना नीट न्याहाळता यावे म्हणून लपत छपत आम्ही दुसरीकडे असलेल्या एका मचाणावर चढलो. आता जवळजवळ आमच्या सभोवार काळवीट आणि फ़क्त काळवीटच होते. मोजले तर साधारण नव्वदेक तरी भरले. दुर्बिणीतून न्याहाळताना त्यांची तुकतुकीत कांती आणि पोटावरचा तो काळसर पट्टा आणि अर्थातच नराची शिंगं अगदी नजरेत भरली. सूर्य जवळजवळ अस्ताला जात होता आणि त्या पार्श्वभूमीवर हा देखणा प्राणी ही संध्याकाळ कायमसाठी आठवणीत ठेऊन गेला......मला वाटतं मालवणला तारकर्लीला समुद्राच्या साक्षीने पाहिलेला सूर्यास्त जितका देखणा होता तितकाच अविस्मरणीय हाही होता. खरंच निसर्गाच्या जेवढ्या जवळ आपण जाऊ तितकंच तो आपल्या विविध रुपांनी आपलं विश्व भारुन टाकतो.

त्यानंतर आम्ही रात्रीही जेवणं झाल्यावर पुन्हा आमच्या त्या बसने गावचा एक छोटा दौरा केला. कुणीतरी गावात कोल्हे-बिल्हे येतात अशी माहिती काढली होती. आम्हाला काही दिसलं नाही पण दुसर्‍या दिवशी सकाळी या भागातले थोडे पक्षीही पाहायचे होते आणि काळवीटांनी पुन्हा दर्शन द्यावं ही अपेक्षा अर्थातच होतीच त्यामुळे सरळ येऊन झोपलो.

अभयारण्याच्या तोंडावरच जी झाडं आहेत तिथेच खूप छान छान पक्षी दिसले..मला काळवीट पाहायचीच होती म्हणून पुन्हा एकदा आतमध्ये जायचं ठरवलं आणि थोडं जास्त मध्ये गेल्यावर पुन्हा एक छोटा कळपही दिसला. फ़क्त आम्हाला सर्वांना परत मुंबईला जायचं होतं म्हणून लवकर आवरतं घेतलं कारण कुणाच्यातरी डोक्यामध्ये सिंहगड पण करुन जाऊया अशी टुम निघाली. अर्थात नाही म्हणणं शक्य नव्हतं पण सिंहगडावर चढणं वगैरे होंणार नव्हतं. थोडं पिकनिकसारखं होणार होतं.

तरी येताना दुपारी भिगवण म्हणून एक गाव आहे तिथल्या तलावावरुन जाताना सुनिलला आयबिस दिसला आणि त्याने इथे थांबायलाच हवं म्हणून आग्रह धरला. त्याचं म्हणणं ऐकलं ते बरंच झालं. तिथे पाणपक्ष्यांची रेलचेलच होती. आम्हाला चोचीवर पांढरा ठिपका असणारे कूट,काळ्या डोक्याचे आयबिस, पेंटेड स्टॉर्क्स आणि बरेच पक्षी दिसले. मला वाटतं लोकल मायग्रेटरी बर्डसाठी हे ठिकाण चांगलं असावं.

हे सर्व कमी होतं म्हणून सिंहगडावरची पिकनिकही केली. त्याचं मुख्य कारण परतीच्या वाटेवर एका ठिकाणी खाल्लेली भाजलेली कणसं सोडली तर पोटात काही नव्हतं हेही असावं असं मला आता वाटतं. सिंहगडावरचं धुकं मला फ़ार आवडलं पण जास्त वेळ नव्हता.शिवाय थोडं पावसासारखं होतं त्यामुळे खालेल्या कांदा भजी आणि झुणका भाकरी मटका दही यांना विसरता येत नाही.बरं झालं थोडा वेळासाठी तरी गेलो कारण त्यानंतर कधीच सिंहगडावर जायचा योग आला नाही.

भरगच्च भटकंतीचे हे पाहायला गेलं तर दोनच दिवस. या दौर्‍यात भटकंतीत करता येणासारख्या बर्‍याच जागा केल्या पण जास्त लक्षात राहिले तर टणाटण उड्या मारणारे चिंकारा आणि मावळत्या सूर्याच्या साक्षीने पाहिलेले काळवीट....



सगळे फ़ोटो सौजन्य डॉ. संगिता धानुका





Monday, May 9, 2011

आठवणीतलं कर्नाळा

पक्षीनिरिक्षणाचा छंद लागला आणि मग वेध लागला तो एखाद्या खरखुरं पक्षी अभयारण्यात जायचा. अर्थात त्यावेळी नुकतंच अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण होत होतं. ग्रुपमधले सगळेच साधारण माझ्यासारखेच मध्यमवर्गीय.त्यामुळे मग आपल्या मध्यमवर्गीय बजेटमध्ये बसणारं, मुंबईच्या जवळ असलेलं कर्नाळा हेच ठिकाण आमच्यासारख्यांसाठी योग्य होतं.कर्नाळ्याला मी निदान साताठवेळा तरी गेलेय. माझ्यासाठी कर्नाळा म्हणजे एखाद्या दिग्गज गायकाच्या मैफ़िलीसारखं..सुरुवातीला विलंबित खयालासारखं, सगळ्यांनाच कळेल असं नाही आणि "निघुया अपने बस की बात नही” म्हणावं तर एखादा सूर ह्र्दयाचा ठाव घेणारा, आपल्याला त्या मैफ़िलीचा भंग करुन निघु देणार नाही. मैफ़िलीत सुरु केलेला राग पूर्ण ऐकायचा संयम दाखवून मग स्वतः थोडा अभ्यास करुन रागदारी ऐकायची सवय लावली तर मात्र भैरवी आली की चुटपुट लावणारा...काही वेळा ठुमरी आणि तराण्यामधुन आपल्याला डोलायला लावणारा कर्नाळा.

कितीतरी आठवणी आहेत...अगदी सुरुवातीला फ़क्त चढायची सवय नाही म्हणून दमवणारा, मग अंगठ्याखाली चढलं की वरती सुटणारा भन्नाट वारा आणि आपली पांढरी पाठ दाखवत मस्त तरंगणार्‍या गिधाडांना पाहताना, एकदा माझ्या वाढदिवसाचा केक सॅकमध्ये लपवून वरपर्यंत नेऊन सगळ्यांना सरप्राइज देतानाचा आनंद घेणारा तर एकदा उतरताना नेमकं ग्रुपमधली एक मुलगी पायर्‍यांवरुन घसरल्यामुळे तिला इतरांबरोबर उतरवताना आलेलं टेंशन, त्यापेक्षाही जास्त टेंशन आणखी एका मैत्रीणीच्या वाढदिवसाला फ़क्त चौघीजणींनी कर्नाळा सर करायला जाताना त्रास देणारा मुलांचा एक ग्रुप भेटल्यामुळे आलेला प्रसंग निभावताना. आता हे सगळंच सोडून इतकी वर्षे झालीत हे सर्व एकत्र आठवतेय तेव्हा लक्षात येतंय आणि पुन्हा एकदा कर्नाळ्याला जावसं वाटतंय़.
सर्वात पहिल्यांदी कर्नाळ्याला गेलो होतो तेव्हा जाताना दादरहून बसने पनवेल मार्गे सक्काळ सक्काळी गेलो होतो. "जैत रे जैत" चित्रपटात माहित झालेला कर्नाळा तोवर मी फ़क्त महामार्गाने जाताना दिसणारा कर्नाळ्याचा अंगठा बसमधुन तेवढा पाहिला होता. जाताना तर वेळेवर गेलो. चढताना पायर्‍या असल्या तरी मध्ये मध्ये काही ठिकाणी त्या थोड्या जास्त उभ्या आहेत किंवा काही ठिकाणी त्यातलं अंतर जास्त आहे त्यामुळे झाली दमणूक आठवते. पण एकदा वर पोहोचलं की बेभान सुटलेला वारा पिऊन आणि खाली दिसणारं जंगल पाहिलं की सारा शीण कुठे जातो ते कळत नाही. पहिल्यावेळी मात्र माझं विलंबीत खयालासारखं झालं होतं. एवढ्या मोठ्या पायपिटीत जाताना काही म्हणजे काही दिसलं नाही. फ़क्त वर गेल्यावर पांढरपाठी गिधाडं आमच्या खालुन गेली. "हेच पक्षीअभयारण्य म्हणायचं का?" " हा हायवे गेलाय नं इथुन, त्यामुळे आवाज वाढलेत मग कसे दिसणार पक्षी???" असं सगळं कोल्ह्याला लागलेल्या आंबट द्राक्ष्यांसारखं बोलुन झालं.पण मान्सुनचा पाऊस झाल्यानंतर गेल्यामुळे वेड लावणारी दिसणारी हिरवाई आणि चढताना झांडांच्या गर्द छायेत जाणवणारा थंडावा यामुळे कर्नाळा मला तरीही खूप आवडला. मुंबईच्या जवळ हे एक गाजरही होतंच. पण परत निघताना संध्याकाळी कुठुनश्या येणार्‍या सगळ्या बस भरुन जाताना मात्र आता परत कसं जायचं याचं जाम दडपण आलं होतं.
शेवटी जवानांचं सामान नेणार्‍या एका टेम्पोवाल्याला आमची दया आली आणि काही जवान मागे आणि आम्ही दहा-बारा जण टेम्पोच्या मागच्या बाजुला काठ पकडून तो भन्नाट वारा खात एकदाचे पनवेलला पोहोचलो आणि पुन्हा दादरची बस-लोकल असं सगळं साग्रसंगीत करुन घरी येतानाच पुन्हा जाऊया रे एकदाचा गजर होताच. आणि मालवणला जाऊन आल्यानंतर ग्रुपचं स्वतःचं वाहन करुन ट्रेक जास्त आणखीबद्ध करता येतात किंवा आमच्यासारख्यांच्या बजेटमध्ये पण बसवता येतात हे कळल्याचा आत्मविश्वास असेल, त्याच बसने आम्ही तेरा-चौदा जण मिळुन यावेळी बसने पुन्हा कर्नाळ्याला निघालो. यावेळचं कर्नाळ्याची मैफ़िल रंगतदार होती.नेहमीपेक्षा लवकर पोहोचल्यामुळे पिकनिकर्स आले नव्हते. त्यामुळे चढतानाच बर्‍यापैकी पक्षीदर्शन झालं. दुपारच्यावेळी वर पोहोचुन मस्त तोच तो उनाड वारा खात बसताना सुख म्हणजे काय ते हेच असतं का असं वाटण्याचे ते दिवस आत्ता आठवलं तरी ती नशा चढते आणि खांद्यावर सॅक टाकुन भटकंतीला बाहेर पडावंसं वाटतं.
स्वतःच्या बसने जाण्याचा फ़ायदा येता-जाता दोन्हीवेळा झाल्यामुळे झिंग लागल्यासारखे दुसर्‍या एका मान्सुनमध्ये पुन्हा त्याच बसनेच गेलो. यावेळी ग्रुपमध्ये दोन-चार मेंबरं वाढली पण होती. अर्थात बजेट मॅनेजमेंटला अशी दोन-तीन जास्तीची लोकं बरीच पडतात. यावेळी कर्नाळ्याच्या मनात काहीतरी वेगळं होतं.जाताना कदाचित गप्पांचा अतिरेक सुरु होता की काय नीट आठवत नाही पण विशेष काही दिसलं नाही. नेहमीचे होले आणि सूर्यपक्षीवगैरे दिसले. येताना मात्र मी राकेशसोबत उतरत होते त्याच्या पायगुणाने सारखं काही नं काहीतरी दिसत होतं.
Credit: Free images from acobox.com
याआधीही त्याने बरेच चांगले स्पॉटिंग केलेत तोच शिरस्ता त्यादिवशीही कायम होता. त्यादिवशी खाली येताना बरेच पक्षी दिसले पण लक्षात राहिला तो मी पहिल्यांदीच पाहिलेला हिरवागार क्लोरोप्सिस आणि ग्रीन पिजन. त्यानंतर क्लोरोप्सिस मी बर्‍याचदा पाहिला पण पहिल्यांदी राकेशने कर्नाळ्याला तो दाखवताना (अर्थात त्याला) झालेला त्रास. "अरे तेरे तीन बजे देख"..." अभी देख नं हील रहा है वो डाल के पीछे"...बापरे किती हिरवा आणि झाडात अदृष्यच असलेला सुंदर पक्षी तो...अहाहा....ग्रीन पिजन मात्र नंतर कधीच दिसला नाही. त्यावेळी पण तो उतरताना थोडा वेळच दिसला आणि मग झाडीत नाहीसा झाला. तो बाकीच्यांना पण पाहता यावा म्हणून मागे पाहातो तो काय? बडबड करत उतरणारी मीनल धपाकन पडली होती. तिला बरंच लागलं असावं कारण आमच्या ग्रुपमधल्या दोन मुलांनी दोन्ही बाजुला पकडलं होतं तरी तिचं कण्हणं सुरुच होतं. नशीबाने आमच्यातला नितीन डॉक्टर होता पण तिला पेन किलर देऊन मुंबईला गेल्यावर कुठे न्यावं खेरीज विशेष काहीच करण्यासारखं नव्हतं. नंतर कळलं की तिला लिगामेंट फ़्रॅक्चर झालं होतं आणि दोनेक महिनेतरी घरीच राहावं लागणार होतं. ग्रुपमध्ये एकाचं जरी बिनसलं की आपसूक पूर्ण ट्रेकवर त्याची छाया येते तसंच झालं आणि सगळीजणं शांतपणे उतरायला लागली. मध्ये मध्ये चढण्यापेक्षा उतरणं कसं जास्त रिस्की आहे आणि तिने असं लागु न द्यायला काय करायला हवं होतंपासुन ते तिची थोडीफ़ार खेचाखेची हेही सुरु होतंच. नशीब खालीच आम्ही भाड्याने आणलेली पंधरा सिटर होती नाहीतर आज काय खरं नव्हतं.


हे एक संकट समोर आहे तोच दुसरा एक नवाच अनुभव आमच्यासाठी पुढे होताच. आम्ही उतरताना एक टारगट मुलांचा ग्रुप पळतपळत वर गेला. नुस्ती हुल्लडगिरी सुरु होती म्हणून जाणवलं पण कुठे लक्ष द्या? पण त्यानंतर वीसेक मिनिटांतच आमच्यापाठी एक घाईघाईत उतरणारं जोडपं दिसलं. पाय मोडलेल्या मेंबरमुळे आमचा वेग कमी होता पण त्यातली बायको मुसमुसताना दिसली म्हणून जयेशने तिच्या नवर्‍याला काही मदत हवी आहे का असं सहज विचारलं आणि कळलं ते थोडं धक्कादायकच होतं. आम्हाला वर वेगात जाणारी जी मुलं दिसली होती त्यांनी आमच्या मागे उतरणार्‍या या जोडप्याला मध्ये कुठेतरी एकांतात गाठलं आणि धमकावलं. बायकोला काही होऊ नये म्हणून अंगावरचे, दागिने, घड्याळ, पाकिट असं सगळं त्या जोडप्याने त्यांना दिलं आणि आता विमनस्कपणे खाली उतरत होते. आमच्या अंगावर काटा आला. मुळात नव्या लग्न झालेल्या जोडप्याने फ़िरायला यायची ही जागा नव्हे आणि त्यातही दागिने इ. जोखीम घेऊन. पण आता गेली गोष्ट होऊन गेली होती. आमच्या बसमध्ये जागा असणार होती म्हणून आम्ही त्यांना पनवेलपर्यंत सोडायची तयारी दाखवली आणि पुढच्या प्रवासासाठी पैसे. त्यानंतर आणखीच गप्पपणे खाली उतरून बसमध्ये चढुन एका दिवसांत किती प्रसंग दिसले त्याचा विचार करत घरी परतलो. विलंबीत लयीत सुरु झालेली, दादरा आणि तराण्याच्या साथीत रंगलेली ही आणखी एक मैफ़ल.

त्यानंतरची कर्नाळा ट्रीप आठवते ती अशाच एका जूनमधली. संगीताचा वाढदिवस जूनमध्ये असायचा आणि नुकताच सुरु झालेला पावसाळा कर्नाळ्यात छान अनुभवता येईल म्हणून अल्पाच्या गाडीने चटकन होईल म्हणून अगदी आयत्यावेळी ठरवलेली आणखी एक कर्नाळा ट्रीप अशीच वेगळा अनुभव देणारी. आम्ही चार मुलीच होतो. पण बाकीच्या वयाने माझ्यापेक्षा जास्त मॅच्युअर ग्रुप म्हणून चला जाऊया म्हटलं आणि दुपारपर्यंत चढलो, वरती घरुन आणलेला खाऊ खाल्ला आणि तेव्हा कर्नाळ्याच्या पायथ्याशी एक हॉटेल होतं (आता ते बहुधा नसावं) तिथे वडापाव खाऊन परत निघुया म्हणून उतरताना माझ्या लक्षात आलं नाही पण माझ्या मॅच्युअर मैत्रीणींच्या लक्षात आलं की एक मध्यमवयीन माणसांचं टोळकं आपला पाठलाग करतंय. आम्ही ब्रेक घेतला की आसपास ब्रेक घेणं, कमेन्ट्स इ. त्यावेळी थोडं घाबरायला झालं पण नशीबाने आम्ही पायथ्याच्या साधारण जवळपास होतो आणि अल्पा तशी व्यवसायासाठी अनेक बिल्डर वगैरेंशी सामना करते त्यामुळे बरीच बोल्ड आहे. तिने त्यावेळी खूप संयमाने हाताळलं. सुरुवातीला मला आणि इतरांना काही सुचना देताना त्या टारगट ग्रुपला कळलंही नाही आणि मग पायथ्याची गर्दी दिसायला लागली तशी त्यांना बरोबर झापुन पटापट उतरून आम्ही त्या हॉटेलात चहा आणि वडा-पाव खाताना आपणही असं एकटं यायला नको होतं या चर्चा करत राहिलो. वरच्या दोन प्रसंगामध्ये कर्नाळ्याला काही सांगायचं होतं का असं त्रयस्थपणे या घटनांकडे पाहिलं की मला उगीच वाटतं. कदाचित आता कर्नाळा जास्त करुन पिकनिकर्सचं होतंय हाच तो संदेश असावा.
हे दोन थोडे कडवट प्रसंग जरी असले तरी याच्या मध्येच मी एका एप्रिलमध्ये कर्नाळ्याला गेलो तेव्हा माझ्या सॅकमध्ये मॉनजिनिसचा माझा आणि आमच्या ग्रुपचा आवडता ब्लॅक फ़ॉरेस्ट घेऊन गेले होते तो ट्रेकही मला आठवायला आवडतो. यावेळी पण आम्ही त्या पंधरा सिटरनेच गेलो होतो. खरं तर आम्ही दहाएक जणंच असू पण स्वतःच वाहन असणं कर्नाळ्यासाठी तरी सोयिस्कर पडतं हे आता अनुभवाने लक्षात आलं होतं. माझ्या आधीच्या वाढदिवसाला हीच सॅक माझ्या याच ग्रुपमधल्या मित्र-मैत्रीणींनी मला दिली होती. खरं तर कर्नाळ्यासाठी ती मोठी होती. पण दुर्बिण, पाणी, सालिम अलींचं पुस्तक घेऊन फ़िरायचं तर ती सॅक बरी पडे म्हणून मी ती आणली असावी असं सर्वांना वाटलं होतं आणि वर पोहोचल्यावर आम्ही खायचा ब्रेक घेतला तेव्हा त्यातुन केक काढुन सगळ्यांच्या चेहर्‍यावरचं आश्चर्य आणि आनंद पाहण्यापुढे ते ओझं घेऊन चढणं काहीच नव्हतं. खरंच माझ्या भटकंती कारकिर्दीतले ते मंतरलेले दिवस होते.

त्यानंतर नेहमी माझ्या तोंडून कर्नाळा कर्नाळा ऐकुन माझ्या एका जास्त ट्रेक न करणार्‍या ग्रुपबरोबर बाइकने कर्नाळ्याला जायचा योगही आला. त्यातही मला कुणाची तरी बाइक पनवेलनंतर चालवायलाही मिळाली होती. त्यामुळे आपण कधीतरी बाइकने एखादा मोठा ट्रेक करु इ.इ. स्वप्न रंगवायला मीही सुरुवात केली होती..पण मुलींच्या आयुष्यात काही स्वप्न फ़क्त स्वप्नंच राहतात तसंच माझं हे एक स्वप्न अद्यापतरी सत्यात आलं नाही.आलंच तर त्याची सुरुवात मी कर्नाळ्यापासुन केली असं सांगायला मला नक्कीच आवडेल.
तुर्तास तरी सुरुवातीला म्हटलं तसं कर्नाळ्याच्या आठवणींची ही सुरेल मैफ़ल कधीच संपु नये, कर्नाळ्याने कधी बदलु नये आणि आपण त्याला कधी विसरु नये असं मला तेव्हा वाटायचं. फ़क्त तो योग आता पुन्हा कधी येतो त्याची वाट पाहात त्या आठवणी जागवायच्या आणि त्या सुरेल क्षणांची आपण काही काळ का होईना साक्षिदार होतो याबद्दल त्या विधिलिखिताचे आभार मानायचे इतकंच मी करु शकते.....


फ़ोटो...साभार डॉ. संगिता धानुका आणि मायाजाल