RSS

Friday, December 10, 2010

मालवण - शेवटचा दिवस मार्गे राधानगरी

मालवण भाग एक आणि दोन नंतर पुढे

तिसरा आणि शेवटचा दिवस म्हणजे पळापळ...एक तर ट्रिप संपतेय याची थोडी हुरहुर...पुन्हा असं कधी जाता येईल का अशा संमिश्र भावना आणि असंच काही काही...नंतर खरं सांगायचं तर अशा प्रकारे बाहेर गेलो नाहीच असं नाही पण प्रत्येक वेळी "आपलं मालवण" म्हटलं की प्रत्येकजण आठवणींच्या राज्यात जातो आणि ही सगळ्यात मस्त ट्रीप होती हे मान्य करावंच लागतं....


परत जाताना माझ्यासारख्या भूगोल कच्चा असणार्‍यांसाठी आणखी एक गम्मत होती ती म्हणजे येताना आम्ही आलो होतो त्याच रस्त्याने परत जाणार नव्हतो. तर परतीचा मार्ग व्हाया दाजीपूरचं राधानगरी अभयारण्य होता...म्या पामरासाठी गाडी तो एक मोठा गेट का जे काय होतं ते ओलांडल्यानंतर एकदम कोकणची लाल माती संपते आणि घाटावरचा भाग सुरु होतो हे म्हणजे अजी म्या ब्रम्ह पाहिले असं काही होतं..म्हणजे कोकणात आणि कोल्हापुरमध्ये शेपरेट ट्रिपा झाल्या होत्या पण हे असं कोकण संपलं आणि मग घाट हा प्रकार म्हणजे मनात एकदम बसला आणि मला वाटत तेवढ्यासाठी जयेशला मी तरी स्तुती (खरी) करुन खूप चढवलं..त्याने तो जरा जास्तच चढला हे वेगळं....पण मजा आली....

तर राधानगरी हे कोल्हापुरातलं बायसन म्हणजे गौर(किंवा मला वाटतं गवा) या प्राण्यासाठीचं राखीव अभयारण्य. खरं तर महाराष्ट्रातलं पहिलंवहिलं अभयारण्य ही पण ओळख आहे पण तरी बायसनसाठी हे जास्त प्रसिद्ध आहे. याला ओळखायची खूण म्हणजे त्याच्या नाकासमोर असणारा पांढरा ठिपका. आम्ही तसे दुपारचे पोहोचत होतो त्यामुळे पक्षी दिसण्याची शक्यता तशी कमी होती आणि आम्ही तिथल्या एका मचाणापर्यंत गाडीनेच जात होतो, एखादा छोटा ट्रेल करण्याइतका वेळ नसणार होता त्यामुळे बसमधुनच जंगलदर्शन करण्याचा प्रयत्न सुरु होता. त्यात तशी मजा नव्हती. पण कधीतरी फ़क्त राधानगरीला यायला हवं हे मात्र तेव्हापासून मनात आहे (आणि अर्थातच नंतर कधीही झालं नाही हे वेगळं सांगायला नको).

मध्ये मध्ये काही दिसेल असं वाटलं तेव्हा गाडी थांबवली होती पण पक्षी पाहायचे तर खूप सहनशक्ती आणि वेळ पाहिजे..एकतर मार्चमधली टळटळीत दुपार म्हणजे सगळे कुठे नं कुठे आसर्‍याला थांबलेले असणार. त्यातल्या त्यात आम्हाला एक ग्रे जंगल फ़ाउल फ़क्त पळत जाताना दिसली होती तेवढी लिस्टमध्ये आहे म्हणून आठवतंय..

पक्षी दिसले नाहीत तरी तसा फ़रक पडणार नव्हता म्हणा कारण मालवणने तो कोटा पूर्ण केला होता.पण बायसनसाठी मात्र आमच्या ग्रुपमधला रेडा (तोच तो वर उल्लेख केलेला जास्त चढलेला...:)) ओव्हरएक्साइटेड होता त्यामुळे मचाणावर गेल्यावर त्याने बायसनसाठी आपली दुर्बीण रोखली..आणि अर्थात तो नसता तरी त्याला दिसलाच असता. पण बर्‍याच लांब जंगलाच्या दुसर्‍या भागात काळं काहीतरी बसलेलं त्याला दिसलं एकदाचं आणि अर्थातच नाकावरचा तो पांढरा ठिपका.मग आम्ही पण हो हो म्हणून बराच वेळ त्याला पाहिलं...मला खरं सांगायचं तर दगड आणि त्यात एक काळा ठिपका यात काय फ़रक आहे रे असं एकदा विचारावंस वाटलं पण अंतर पाहता त्याच्या हालचाली कळणं कठीण होतं..त्यामुळे उगा त्या वादात मी काही पडले नाही..

मध्ये एक सुतार पक्षीही ठोकाठोकीमुळे दिसला आणि काही चितळंही नशीबात होती.. एका पाणवठ्याच्या जागी चेकड किलबॅक अशा आणखी काही स्पॉटिंगही झाल्या आणि एकंदरित राधानगरीत परत आलं पाहिजे या बोलीवर आम्ही डेरा हलवला. आता मात्र मध्ये फ़क्त खाऊ थांबे घेऊन म्हमई एवढंच होतं...

परतीची हुरहुर एकदा नव्याने आली...जाताना मस्ती होती पण परत येताना जे पाहिलं त्याची उजळणी...पहिल्यांदीच एकत्र राहिलो त्या आठवणी, मूळ ग्रुपमधली जी मंडळी येऊ शकली नाही त्यांना कसं खिजवता येईल आणि हेच सगळं सुरु होतं...त्यानंतरही एकत्र बाहेर गेलो म्हणजे सुपे-रेहेकुरी वगैरे पण तरी जी मजा या थोडा मोठा ग्रुप झालेल्या मालवणच्या ट्रिपमध्ये आली ती कधीच आली नाही असं आम्ही आता भेटतो तेव्हाही बोलतो. मालवण म्हणजे आमच्या ग्रुपला पडलेलं एक स्वप्न होतं आणि ते यशस्वी करायचं सगळं श्रेय जयेशला जातं. खरं तर आमच्यापेक्षा जास्त जंगल त्याने पाहिलंय आणि त्यावेळी स्वतः प्रस्थापित डॉक्टरचा डॉक्टर मुलगा या नात्याने तो यापेक्षा चांगल्या पद्धतीने सगळं काही अफ़ोर्ड करु शकत होता पण आम्हीही सर्व पाहावं आणि सगळं जणू प्रथमच करतोय, त्याची एक्साइटमेंट या सर्वांनी आम्हाला कधी असं तो आमच्यापेक्षा जास्त पैशाने किंवा अनुभवाने मोठा वाटला नाही. सगळा खर्च आम्ही समान वाटूनच केला..

आता जेव्हा मी खरं जास्त काही अफ़ोर्ड करु शकते पण प्रत्यक्षात करु शकत नाही त्यावेळी या ग्रुपबरोबर केलेल्या अशा भटकंतीच्या आठवणी आल्या की वाटतं महिन्याला तीन हजार रुपयांत जे समाधान होतं ते आता डॉलर्सनी कमवले तरी आहे का?? अर्थात भूतकाळ हा जेव्हा वर्तमान असतो तेव्हा आपण तो विचार तसा करणार नसतो आणि गेलेले दिवस कधी परत येणार नसतात..निदान तेव्हातरी अशा दोस्तांबरोबर भटकंतीचे दिवस आले हेही नसे थोडके....

Sunday, November 28, 2010

मालवण दिवस दुसरा - धामापूर, सिंधुदुर्ग आणि रात्रीची भटकंती

आदल्या दिवशीचा मालवण वृत्तांत इथे वाचता येईल.

धामापूर ही मालवणपासून साधारण १५-१८ कि.मी. अंतरावर असलेली पक्षीअभयारण्य आणि तिथे असलेला मानवनिर्मित मोठ्ठा तलाव असलेली जागा आहे. आमचा मुख्य उद्देश पक्षी पाहाणे असल्यामुळे आम्ही सकाळी लवकरच नाश्ता करुन आमची बस घेऊन तिथे पोहोचलो. सकाळची प्रसन्न वेळ म्हणजे पक्षी पाहण्यासाठी पर्वणीच. माझ्या बर्डलिस्टप्रमाणे फ़क्त धामापुरला त्या दिवशी आम्हाला ३५ जातींचे तरी पक्षी दिसलेत.


त्यात बस पार्क केल्यानंतर जो छोटा पायरस्ता चालुन आम्ही भगवती देवीचं देऊळ आणि त्यासमोरच्या तलावाजवळ पोहोचलो होतो तिथे सुरुवातीलाच आम्हाला स्कार्लेट मिनिव्हेटच्या दोन जोड्या दिसल्या. आतापर्यंत हा पक्षी मी नैसर्गिकरित्या पाहिलाच नव्हता त्यामुळे नर आणि मादी दोघांचे रंग पाहुन अक्षरशः हरखायला झाले. त्यानंतर स्मॉल मिनिव्हेटही दिसली. बाकी नेहमी दिसणारे शिंजीर, आयोरा, बुलबुलाच्या जाती, हळद्या, पारवे, ड्रोंगो हे नेहमीचे साथीदार तर होतेच.

तलावाजवळ दिसलेली पाईड किंगफ़िशरची जोडी जणू काही आमच्यासाठीच तिथे थांबली होती. आणि बाकीचे पाणपक्षी अर्थातच होते पण त्या शांत देवळात दर्शन करुन झाल्यावर बाहेर बसलो असताना राकेशने तलावाच्या दुसर्‍या बाजुला स्पॉट केलेला क्रेस्टेड हॉक इगल म्हणजे या सगळ्यावर कळस होता.

आधी त्याला पलीकडच्या किनार्‍यावर एक मोठा पक्षी दिसला आहे इतकं जाणवलं आणि मग दुर्बिणीने पाहून सालिम अलींच्या पुस्तकात कर्न्फ़म करुन मग त्याला जो हर्षवायु झाला होता तो मला आजही तसाच आठवतो. पाण्याच्या जवळ हा गरुड बराच वेळ बसला होता. एकतर त्याबाजुला एकांत आणि मार्चमधला उन्हाळा यामुळे बहुतेक तो तिथे इतका वेळ असावा असं वाटतं. आम्ही सर्वांनी मनसोक्त त्याला पाहून घेतलं आणि दुपारच्या जेवणासाठी मुक्कामी परत आलो.

संध्याकाळी तारकर्लीचा किनारा आणि सिंधुदुर्ग किल्ला असा बेत होता. या ग्रुपमध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे कितीही चटकन विचार मनात आला तरी कुणीही थोड्या वेळाने निघुया म्हणून कंटाळा केला नाही त्यामुळे हातात असलेला सगळा वेळ आम्ही निसर्गभ्रमंती करु शकलो.थोडक्यात तेरा माणसांची स्वतः बस घेऊन जाण्याचा अगदी पुरेपुर लाभ आम्ही उठवला.

सिंधुदुर्गचा किल्ला म्हणजे बोटीतुन सगळ्यांनी एकत्र जायचा अनुभव, मस्ती आणि तिथेही मनसोक्त भटकंती आणि येताना किनार्‍यावर मच्छिमार लोकांची वर्दळ पाहणे याची मजा होती. तारकर्लीला आमच्या आधी एक ग्रुप आला होता त्यांना डॉल्फ़िन दिसले होते पण आमचं मात्र तितकं सुदैव नसावं. पण खरं सांगायचं तर धामापूर  आणि सिंधुदुर्गमध्ये मन इतकं भरुन आलं होतं की माझ्या पक्ष्यांच्या नोंदीच्या खाली लिहिलेलं wonderful day मला आजही बरंच काही सांगुन जातंय..

पण अजून रात्र बाकी होती. आणि जयेशच्या मते रात्री थोडं गावाबाहेर बस काढली तर एखादं शिकारीसाठी बाहेर निघालेलं जनावर दिसू शकेल त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर पुन्हा सगळं पब्लिक तयार झालं. माझ्या मते नाइट जार हा रात्रीच दिसणारा पक्षी आणि ससे हे सोडलं तर आम्हाला काही दिसलं नाही. एक म्हणजे आम्ही काही कुठल्या राखीव जंगलात गाडी घातली नव्हती आणि दुसरं म्हणजे त्या भागात कुठे काय दिसु शकतं हे सांगणारा कुणी वाटाड्या आमच्याबरोबर नव्हता. पण अगदी पहिल्यांदा असं किर्र काळोखात फ़िरताना जसं रोमांचकारी वाटेल तसं मात्र झालं होतं. मध्ये एका ठिकाणी खसफ़स झाली म्हणून गाडीचं इंजिन बंद करुन आम्ही थांबलो. जयेशच्या अंगात जरा खुमखुमी असल्याने त्याने डोक्यावर लावायची टॉर्च असते ती लावुन उतरून थोडं जाऊनही पाहिलं.

लाल डोळे लांब दिसत होते पण माझं रात्रीच्या अंधारात प्राणी ओळखण्याचं कौशल्य शून्यच आहे. त्यामुळे मी तरी फ़क्त बसमधुन पाहात होते. थोडं पुढे जाऊन जयेशही परत आला. त्याच्या मते ते तरस होतं. असुही शकतं. पण हा अनुभव अजुनही आठवला की वाटतं कुणालाच कसल्या प्रापंचिक चिंता नव्हत्या त्यामुळे मनमुराद भटकण्याचे ते दिवस तेव्हा आले हे तरी नशीब नाही?? आता तर आठवलं तरी आपण नक्की कसली ओझी वाहतो आहोत आणि या अशा जुन्या आठवणीमध्ये पुनःपुन्हा जातो आहोत...

हम्म..अजुन एक दिवस उरलाय आणि कुठे जाणार आहोत आपण?? अजुन काय काय अनुभवायचं आहे बरं......

Sunday, November 21, 2010

मालवणची भटकंती

माझ्या पक्षीनिरिक्षणकालाचा "हनिमुन पिरियड" म्हणता येईल त्या दिवसांतली ही ट्रिप आहे. जयेशचं गाव मालवण आणि तिथला परिसर, दिसणारं पक्षीजीवन याबद्दल त्याला चांगली माहिती होती आणि चांगली गोष्ट ही, की आमचा सगळा ग्रुप तिथे घेऊन जावा, ही कल्पनाही त्यानेच आमच्या मागे लागुन मार्गी लावली. योग्यवेळी योग्य सहकारी मिळाले की एखादं प्रोजेक्ट जसं हमखास यशस्वी होतं तसंच या मालवण दौर्‍याचं झालं.
आईने माझी एक छोटी डायरी तिच्याकडे राहिली होती तिच्यामध्ये या मालवण फ़ेरीची सगळी बर्ड-लिस्ट वाचताना मी स्वतःलाच नशीबवान समजते की मला अशा प्रकारेही फ़िरता आलं. त्या दौर्‍याची या नोंदीप्रमाणे आठवेल तशी ही कहाणी.

Paradise flycatcher male



राखी धनेश

हळद्या
आम्ही मार्चमध्ये हा दौरा आखला होता आणि अगदी फ़ुल हाउस म्हणजे साधारण १२-१३ जण मिनी बसने मुंबईहुन मालवणला निघालो होतो. यावेळी आमच्याबरोबर सर्वात लहान भटक्या होता तो म्हणजे "केदार", त्याने नुकतीच दहावीची परिक्षा दिली होती. बाकी आम्ही सगळे कर्तेसवरते होतो. यात सगळेच आमच्या मूळ ग्रुपमधले नव्हते पण काहींनी आपले पक्षीनिरीक्षणाची आवड असणारे मित्र-मैत्रीणी आणल्यामुळे सर्व मिळून १२-१३ झालो होतो. सर्वानुमते अंधेरी पुर्वेकडे भेटून निघायचं ठरलं त्याप्रमाणे बसही तिथंच बोलावली होती. बर्‍याच सकाळी निघालो होतो. तिथे तीन दिवसांचा मुक्काम होता त्याप्रमाणे सामानही जास्त होतं. सुनीलला यायला जमणार नव्हतं पण तरी आम्हाला निरोप द्यायला तो खास अंधेरीला आल्याचं मला अजुनही आठवतं त्याचा पडलेला चेहरा आम्हाला दिसु नये याचा कसोशीने प्रयत्न चालला होता पण अर्थात आम्ही त्याला जास्त खिजवले नाही. अंधेरीहून निघाल्यावर आम्हाला फ़क्त संगिता आणि तिची मैत्रीण सुगंधा यांना दादरहून घ्यायचे होते की मग आम्ही सुसाट. बसमध्ये अक्षरशः पुन्हा कॉलेजजीवन जगल्यासारखी तुफ़ान मस्ती, गाणी, हैदोस घालुन आम्ही नक्की पक्षी पाहायला चाललोत का असं काही वातावरण निर्माण झालं.पण गाडीने कोकणातल्या लाल मातीला उधळायला सुरुवात केली तसा आमच्यातल्या पक्षीनिरीक्षक जागा झाला.


खंड्या
 त्याचं कारण मुळात हे होतं की ज्या पक्ष्यांना मुंबईच्या नॅशनल पार्कात शोध शोध शोधावं लागायचं ते अगदी आमच्यासमोर हाय हॅलो करायला दिसत होते. त्यांना न्याहाळायला दुर्बिणीची पण गरज पडत नव्हती. आजुबाजुची शेतं, पुलांवरुन बस जाताना दिसलेली नदीची पात्रं अशा अनेक ठिकाणी आम्हाला सुरुवात व्हायच्या आधीच हा मटका लागल्यासारखं झालं होतं. राष्ट्रीय पक्ष्यापासुन सुरुवात झाली ती अगदी पांढर्‍या पोटाचा खंड्या आणि चक्क धनेशाच्या दोन जोड्याही(त्यातही मलाबार पाईड हॉर्नबिल) आम्हाला सहजगत्या दिसल्या. सगळीजण जाम उत्तेजित झाले. मी आत्ता ती बर्डलिस्ट वाचतानाही तिथे पोचल्यासारखं होतंय.

पहिल्या प्लानप्रमाणे आम्ही जय़ेशच्याच घरी राहणार होतो म्हणजे राहिलोही होतो. पण दुसर्‍या दिवशी तिथे त्यांनी घराचा काही भाग कुणाला वापरायला दिला होता त्यांना आमचं येणं कितपत रुचतंय याचा अंदाज न आल्यामुळे तिथेच जवळ एका घर कम खानावळीत राहिलो. तिथे राहण्याचा फ़ायदा म्हणजे अस्सल मालवणी घरगुती जेवण मिळालं आणि घरकाम करायचा त्रासही वाचला.

स्वर्गीय नर्तक
१८ मार्चला साधारण साडे-तीनच्या सुमारास पोहोचलो तर जयेशच्या घराच्या मागेच आम्हाला पाहून पॅराडाइस फ़्लायकॅचरचा मेल दुसर्‍या फ़ांदीवर उडाला. त्याला इतक्या सहजगत्या पाहुन खरं तर आम्हीच उडालो. नॅशनल पार्कात हा "स्वर्गीय नर्तक" दिसावा म्हणून किती नवस बोलायचो आम्ही! अगदी एकदा संगिताने आणलेल्या खिरीला त्या दिवशी मोठ्ठा दांडा असलेला चमचा आणला होता आणि त्यादिवशी नेमका हा नर्तक दिसला तर त्या चमच्याचंच नाव आम्ही "पॅराडाइस चमचा" ठेवलं. तिला प्रत्येकवेळी शकुन म्हणून तो आणायलाही आम्ही सांगायचो. आणि इथे बघा अजुन आंघोळीपण केल्या नाहीत तर आमचा पक्षीदेव आमच्या पुढे हजर. :)

पाइड खंड्या
मालवणमध्ये असाच सहजगत्या दिसलेला दुसरा पक्षी म्हणजे आमचा एल.जी.बी. अर्थात लार्ज ग्रीन बार्बेट. नॅशनल पार्कात त्याचा "कुकडूक कुकडूक" असा काहीसा आवाज ऐकायचो पण साहेबांचं दर्शन म्हणजे राकेशला दिसला तर. पण जयेशच्या घराच्या ओट्यावर बसल की समोरच्याच झाडावर एल.जी.बी आवाज करतोय आणि आम्ही "आ" वासुन पाहातोय. अहाहा....आणि असं जवळून दर्शन झाल्यावर मग निवांतपणे दुर्बिणीतूनही या पक्ष्यांनी त्यांचे रंग डोळ्यात कायमचे साठवेपर्यंत तिथे बसुन राहणं त्या दिवसांत रोजचं. आम्ही काय बघतो हे त्याच्या शेजारच्यांना कळायचं नाही कारण त्यांच्यासाठी हे पक्षी म्हणजे काही आमच्यासारखी नॉवेल्टी नव्हती. आम्हाला त्यांचा इतका हेवा वाटला ना...

Shrike
त्या दिवशी रात्री जेवल्यावर अंगणात आतापर्यंत पाहिलेले चांगले पंचवीसेक पक्ष्यांच्या लिस्टची उजळणी आणि पुढे काय काय पाहायला मिळेल याच्याच चर्चा सुरु होत्या. एवढा मुंबईपासुनचा रात्रभरचा प्रवास झाला तरी या पक्षीदर्शनाने मात्र कुणीच मरगळलेलं नव्हतं. रात्री त्याच्या घरी झोपुन दुसर्‍या दिवशी त्या घरगुती लॉजमध्ये जायचं होतं. आणि दुसर्‍या दिवशीच्या लिस्टवर होतं धामापुर.

पण त्याबद्द्ल नंतर. आज आठवणी आहेत त्या मालवणचं प्रथम दर्शन, तिथली ताजी हवा, रात्रीचं सामिष जेवण, सोलकढी आणि या सर्वांवर कडी करणारे ते पंचवीसच्या वर दिसलेले वेगवेगळ्या जातींचे पक्षी...

Sunday, October 17, 2010

लोहगडावर एक रात्र आणि दिवस

जसजशी निसर्गभ्रमंतीची आवड निर्माण होते तसतसं हळुहळु नेहमीची नॅशनल पार्क आणि अशा जवळपासच्या जागा सोडून थोडं वेगळ्या जागीही जावंसं वाटायला लागतं. त्यात जर वेळीच योग्य सोबती मिळाले तर मग सह्याद्री हा आपला जवळचा मित्र बनुन किती ओढ लावतो हे ज्यांनी ती तशी भटकंती केलीय किंवा करतात त्यांना सांगायलाच नको.


अशाच एका चर्चेत संगिताने तिच्या माहितीतलं कुणीतरी लोहगडावर जाणार आहे त्यांच्या बरोबर जाऊया का अशी कल्पना पुढे आणली आणि जवळजवळ सगळेच तयार झाले.२००० च्या ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये साधारण खूप पाऊस नाही पण गरमीही नाही अशावेळी आम्ही जायचं ठरवलं. सारेच मुंबईहून जाणार असल्याने एका शनिवारी दुपारी सिंहगडने लोणावळा आणि मग लोकलने मळवली गाठावं. संध्याकाळी चढून, रात्री गडावरच्या गुंफ़ेमध्ये राहावं, रविवारी गड हिंडून मग दुपारी जरी परतीचा प्रवास सुरु केला तरी रविवार रात्रीपर्यंत सारी घरी पोहोचतील अशी साधारण आखणी होती.

आम्ही जवळजवळ सगळीच जणं व्हीटीला भेटलो. माझा क्लायन्टही तेव्हा फ़ोर्टला होता त्यामुळे मलातर जास्तच सोयीचं होतं. शनिवारची दुपार कधी येते असं झालं होतं. एकत्रच भेटल्यामुळे गाडीत एकत्र बसायला मिळालं..लोणावळा-पुण्याला ट्रेनने जायला मला फ़ार आवडतं..कर्जतचा वडा खायचा, पावसाळ्यातले हिरवे डोंगर, धबधबे पाहायचे...ट्रेकच्या आधीच मन प्रसन्न होतं. मला आठवतं हे वडे खाल्यावर सगळ्यांनी आपापला कचरा गाडीबाहेर फ़ेकु नये म्हणून आमच्या ग्रुपमधल्या सत्यमने एक उत्स्फ़ुर्त रोड (की ट्रेन) शो केला होता. जमुरे टाइप संवाद म्हणून आणि आम्ही पण त्याला साथ केली होती. आमच्या सहप्रवाशांना त्यामुळे आम्ही पावसाळ्यात दंगामस्ती करणार्‍या भटक्यांपेक्षा काही वेगळे आहोत असंही वाटलं असावं. पण एक खरं तो प्रवास खूप छान झाला होता. त्या आठवड्याच्या कामाचा शीण हळूहळू विसरायला होत होता.

मळवलीपासुन आधी जो गावातून रस्ता जातो आणि मग डावीकडे भाज्याची लेणी दिसतात तिथपर्यंत सगळं छान सुरु होतं. नंतर मध्ये मध्ये थोडा चढ येतो..(मला वाटतं आता तिथंही रस्ता झाला आहे. पण मी स्वतः नंतर तिथं गेले नाही त्यामुळे नीट माहित नाही) तर त्या चढावाच्या इथे का माहित नाही मला धाप लागायला लागली. पहिल्यांदीच रात्री राहायचा प्लान असल्यामुळे पाठीवर राहायचं, खायचं सामान, पाण्याच्या बाटल्या हे नाही म्हटलं तरी वजनच; शिवाय कामाचा दिवस, त्यामुळे शरीर संध्याकाळी थोडं थकलेलंही होतं. मग माझं काही सामान राकेश,जयेश यांनी काढुन घेतलं आणि माझीही गाडी हलु लागली. खरं हा सगळा आणि यानंतर काही ट्रेक केले त्यातुलनेने लोहगड खूप सोपा आहे आणि नंतर तर सरळ पायर्‍याच आहेत पण त्यावेळचा माझा तो दुसरा किंवा तिसरा ट्रेक होता त्यामुळे सवय नव्हती म्हणूनही असं झालं असावं..

पुन्हा गाव लागुन पायर्‍या लागेस्तो अंधार पडायला लागला होता आणि आमच्या गाईडच्या मते आता लवकर माथा गाठायला हवा. पायर्‍यांचा रस्ता संपेस्तो जवळजवळ अंधारच झाला होता त्यामुळे आम्ही आमच्या पथार्‍या पसरायला पहिले जागा शोधायला सुरुवात केली. तिथे आमच्या आधी आणखी एक ग्रुपही वस्तीला होता आणि मला वाटतं आमच्या ग्रुपमध्ये मी आणि संगिता दोघीच मुली होतो त्यामुळे मग आमच्या रक्षणकर्त्या ग्रुपमित्रांनी आम्हाला सोयीस्कर पडेल अशा जागेची सोय केली...एकदा तिथे सेट झाल्यावर मग बरोबरीच्या खाऊची अंगतपंगत झाली आणि एकदम आम्हाला आठवलं की सुनीलपण येईन असं म्हणाला होता. आम्ही असं म्हणतोय तोच स्वारी चक्क ऑफ़िसचे कपडे आणि लेदरचे बुट अशा अवतारात हजर..मला वाटतं तो कुठल्यातरी इंटरव्ह्युवरुन सरळ इथेच येत होता. कसा काय अंधारात पोहोचला माहित नाही पण ही वल्ली नॅशनल पार्काच्या बाजुला राहुनही खूपदा स्लिपरमध्ये आमच्या बरोबर कान्हेरीला आलीय..कारण घरी नाक्यावर जातो असं काहीतरी सांगितलेलं असायचं मग दुसरं काय करणार?? असो..तर त्या रात्री झोप कमी आणि गप्पा जास्त असं सुरु होतं.

सकाळचे नक्की किती वाजले होते माहित नाही पण गडाखालुन एक सुंदर शीळ येत ऐकु येत होती. अरे Malabar Whistling Thrush अर्चित लगेच म्हणाला..त्या आवाजाचा मागोवा घेण्यासाठी सगळेच एक एक करुन उठले पण त्या दिवशी एकंदरित पक्षीदर्शन नशीबात नव्हतं. खरं तर त्या पूर्ण ट्रेकमध्ये नंतर दिसलेली पांढरपाठी गिधाडं सोडली तर काहीच पाहिल नाही पण जे काही निसर्गदर्शन झालं त्याचं वर्णन करायला शब्द अपुरे पडतील.

त्या थ्रशच्या निमित्ताने उठल्यामुळे प्रथमच गड पाहिला कारण आलो तेव्हा रात्रच होती.सगळा हिरवा आसमंत धुक्याने भरुन गेला होता आणि शुद्ध हवेचा एक वेगळा वास आणि प्रसन्नता जाणवत होती. मला आठवतं मी आणि संगिता त्या धुकंमिश्रीत हिरवाईला पहिल्यांदी पाहताना वेड्यासारख्या इकडे-तिकडे भटकत होतो. सूर्यदेव आले की ते विरणार हे चांगलं ठाऊक होतं ना?

थोड्या वेळाने आम्ही कुणाच्याही सुचनांशिवाय पटापट सकाळची आवराआवरी केली. आमच्याबरोबर संगिताचे एक मित्र (मी त्यांचं नाव पूर्ण विसरले आहे) आम्हाला गाईड म्हणून आले होते ते एकदम पट्टीचे भटके होते त्यामुळे त्यांनी चहाची सोय केली आणि आम्ही बरोबर आणलेल्या सुक्या खाऊचा नाश्ता करुन लगेचच बॅगा बांधुन भटकंतीला तयार झालो.


हे माझे सुरुवातीचे ट्रेकचे दिवस म्हणजे कॅमेरा नाही आणि नोंदी ठेवायचा आळस असे असल्याने आता जितकं आठवतं तितक्यावरच विश्वास. पण त्यांनी आम्हाला सगळा गड फ़िरवला, माहिती दिली आणि सर्वात शेवटी आम्हाला विंचुकाटा हा साधारण गडाच्या सोंडेसारखा भाग आहे तिथे ते घेऊन गेले होते. इथे जाण्यासाठी गड आणि विंचुकाटा यामध्ये एक थोडा कठीण उतरायचा पल्ला आहे. तो मी तरी या गाईडच्या मदतीनेच उतरू शकले होते. पण आमच्या ग्रुपमधल्या जयेशला का माहित नाही अजिबात ते जमलं नाही..आणि मग तो तिथंच आमची वाट पाहात बसुन राहिला होता. परत जाताना ट्रेनमधुन हा विंचुकाटा दिसतो आणि आम्ही जिथे जयेश बसला होता त्या जागेला "जयेश पॉइन्ट" असं नाव देऊन त्याची बरेच महिने टरही उडवली होती.असो, पण या ठिकाणी वारा पीत थांबलो होतो तेव्हा तीन-चार पांढरपाठी गिधाडं जवळजवळ आमच्या डोक्यावरुन घिरट्या घालत गेल्याचं आठवतंय.

आधी आम्ही पोटपुजा विंचुकाट्यावर करणार होतो पण मग आमचाच एक मित्र तिथे एकटा होता त्यामुळे जास्त वेळ काट्यावर काढलाही नाही पण तिथुन वारा भन्नाट लागत होता आणि आजुबाजुचा हिरवा परिसर, शेती इतकं छान वाटत होतं ना?? शिवाय आम्हाला मुंबईला जायचं असल्यामुळे परतीचा प्रवास सुरु करणं भाग होतं. परत येताना आमच्या गाइडने मग आम्हाला गडाचे दरवाजे इ.ची सुद्धा माहिती दिली. एकंदरित मजा आली..पावसाळ्यात कर्जतच्या पुढं कुठंही गेलं तरी निसर्ग वेड लावतो. त्यात असा एखादा गड चढला की वरुन दिसणारं नयनरम्य दृष्य ती जादू मनःपटलावर कोरून ठेवते.

कॅमेरा तेव्हा नव्हताच त्यामुळे फ़ोटो नाहीत, ज्या व्यक्तीच्या प्रयत्नांमुळे तिथे गेलो ती संगिताही नाही, पण आठवणी आहेत. मागे एकदा कुणीतरी लोहगडचे फ़ोटो मेलमध्ये पाठवले होते त्या अनामिकाचे आभार मानुन तेच इथे चिकटवतेय. आणि आठवणीतल्या या अशा जागी पुन्हा केव्हातरी नक्की जाईन असं मनातल्या मनात म्हणतेय...

Saturday, September 11, 2010

शोध माळढोकांचा...

काल एका प्रतिक्रियेमध्ये नाणजचा उल्लेख आला आणि त्यामुळे आपसूक लिहायला विषय मिळाला.कमवायला लागल्यानंतर ठरवलं होतं की आता एक एक करुन जंगलं पालथी घालायची पण प्रत्यक्षात मात्र सुट्टीचा राक्षस साहेबाच्या रुपाने पुढे उभा असायचा; त्यामुळे म्हणावं तसं फ़िरता आलं नाहीच.पण तरी जमलं तशी एक-दोन जवळची अभयारण्य मात्र करु शकले.


२००१ मध्ये केव्हातरी अल्पाने विषय काढला नाणजला गेलो तर येशील का? कोण कोण येऊ शकेल हे माहित नव्हतं पण ही बहुधा महिला-स्पेशल भटकंती असणार होती.दादरहून मी, अल्पा आणि संगिता एकत्र निघणार होतो आणि मुंबईहूनच अल्पाच्या ओळखीने गिरा आणि एक मॅडम (मी यांचं नाव विसरले आहे पण या पार्ले टिळकच्या माजी मुख्याध्यापिका होत्या) आणि पुण्याहून अल्पाची आणखी एक मैत्रीण (हीचंही नाव विसरले पण एकदम मस्त व्यक्ती होती ही...हीने एकटीने केव्हातरी पुण्याहून दिल्लीपर्यंत स्वतःची गाडी एकटी ड्राइव्ह करुन बराच प्रवास केला होता) म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर या गटात एकदम लिंबुटिंबु (वयाने आणि कतृत्वानेही) मीच होते...पण अर्थात जंगलात जाताना मी नेहमीच पाचवीचा गणवेष मनातल्या मनात घालते त्यामुळे सगळ्यांच्या अनुभवातून बरंच काही शिकता येतं..

नमनालाच संगिता कटली कारण तिची मामी खूप सिरियस होती (त्या नंतर गेल्या) आणि मग मी अल्पाला दादरला भेटणार होते. वेळेवर पोचले तरी अल्पा मला अगदी शांत डोक्याने म्हणाली की, ’हे बघ सोलापूरला जायची आपण जी तिकिटं काढली आहेत ती गाडी दादरला थांबतच नाही, व्हि.टी.हून फ़ास्ट आहे आणि आता आपण व्हिटीला जाऊ शकत नाही’ ’का.............य??’ तिच्याकडे अर्थात एक छोटं सोल्युशन होतं.एकतर तिकीट रद्द करायलाही वेळ नव्हता (आणि तेव्हा बजेट हा मोठा इश्यु होताच) तर मागून येणार्‍या मला वाटतं ’सिद्धेश्वर एक्सप्रेस’मध्ये  सोलापुरचं साधं तिकीट काढून चढायचं, ही तिकीट दाखवायची आणि तिकीटचेकर काही कृपा करतो का ते पाहायचं...कारण मला वाटतं सिद्धेश्वरला फ़क्त आरक्षित तिकीट असेल तरच चढता येतं. मला सगळं नवीन होतं कारण त्याआधी मुंबईहून स्वतःच्या डोक्याने फ़क्त पुण्यालाच आगगाडीतून गेले होते..असो जे आरक्षण केलं होतं त्याचे डिटेल्स नीट न पाहायचा मुर्खपणाही स्वतःचाच होता म्हणा.

मग काय? चढलो तसेच आणि बाबा-पुता करुन कुठेतरी जागा मिळवली. सुरुवातीचा टि.सी. बरा होता. दोन मुली म्हणून जास्त काही त्रास दिला नाही पण तरी खाली झोपायचं म्हणजे कसरत होती...कुठेतरी मध्ये कुणी उतरणार हे पाहून त्यानं बर्थही मिळवुन दिला.नशीब. पण त्याची ड्युटी कुठेशी बदलली तेव्हा नवा भिडू, नवा राज...नवी पटवापटवी..कधी एकदाचं सोलापूर येतं असं झालं होतं...आणि एकदाचे दुसर्‍या दिवशी नवाच्या सुमारास उतरलो..ही चुकामुक प्रकरण फ़क्त आमचंच असल्याने बाकीच्या सार्‍या आधीच पोहोचल्या होत्या. त्यामुळे फ़क्त स्टेशनवर नाश्ता करुन तडक एक जीप भाड्याने करुन आम्ही नाणजच्या अभयारण्याच्या रस्त्याला लागलो. जीप केल्याचा खूप फ़ायदा झाला कारण एक म्हणजे स्टेशनहून हे ठिकाण तसं लांब आहेच त्यामुळे यायला जायला जीपचा उपयोग होतो आणि अभयारण्य जरी फ़ार मोठं नसलं तरीही तिथेही फ़िरायला स्वतःचं वाहन असलं की बरं पडतं.

आता इथे एक सुरुवातीलाच सांगायला हवं की माझ्याबरोबर असणार्‍या अनुभवी व्यक्तींनी इथे अभयारण्याच्या गेटपाशीच जे गेस्ट हाऊस आहे त्याचं आधी आरक्षण केलं होतं शिवाय जंगलात फ़िरायची स्पेशल परवानगीही काढून ठेवली होती. आमच्या काही दिवस आधीच बी.एन.एच.एस.ची एक रिसर्च टीम इथं येऊन गेली होती आणि त्यातली लोकं यांना ओळखत असल्याने ते सर्व कसं करायचं हे सारं यांनी समजुन घेतलं होतं; त्यामुळे जेवणाची व्यवस्था इ.चं टेंशन नव्हतं..शिवाय त्यांचा रेफ़रन्स दिल्याने आम्हाला एकदम रॉयल ट्रिटमेंट मिळाली हे सांगणे न लगे.

सोलापुरवरुन नाणजच्या पक्षी अभयारण्यात पोहोचायला नक्की किती वेळ लागला होता हे आता आठवत नाही पण पोचल्यावर लगेच माझ्या कच्च्या भूगोलाची जाणीव मला झाली. हे पहिलंच जंगल होतं ज्याला नक्की जंगल म्हणावं का? असं मला वाटलं. कारण हिरवाईच कुठे दिसत नव्हती...मग सगळी खुरटी, काट्यांवाली झाडं दाखवून पठारातली जंगल अशीच असतात, असं अर्थातच प्रशिक्षण झालं पण शेवटपर्यंत मला आपण जंगलात भटकतोय असं काही म्हणवत नव्हतं...असो.

गेस्ट हाऊस छान होतं, खोल्या ऐसपैस, बाथरुम स्वच्छ आणि हे सर्व मॅनेज करणारे काका मला वाटतं तेच फ़ॉरेस्ट ऑफ़िसरही होते...त्यांनी आमचं खूप छान स्वागत केलं.आम्ही जेवणासाठी भाज्या, तांदुळ,कांदे-बटाटे असं बरंच काही नेलं होतं; ते सर्व त्यांच्या स्वाधीन केलं आणि त्यांच्याबरोबर जेवणाच्या पैशाचं वगैरे ठरवलं. त्यानंतर जाईपर्यंत त्यांनी चविष्ट जेवणं तिन्ही-त्रिकाळ आम्हाला खायला घातलं..पुरुष खूप छान स्वयंपाक करतात असं आमचं सर्वांचं एकमत ठरलं...आणखी एक ऑफ़िसरही होते त्यांनी आम्हाला साधारण रस्ता, नियम, dos and don'ts इ.ची माहितीही दिली.

रस्ता म्हणजे काय सरधोपट एकच एक मुख्य मळलेला पण मोठा रस्ता होता. सरळ जात राहिलं की केव्हा तरी पार्काची हद्द संपे आणि मग गावतही चक्कर मारुन गोल फ़िरुन परत वळसा मारल्यासारखं बॅक टु गेस्ट हाउस करता येतं इतकं सोपं होतं..आमच्या गाडीचा ड्रायव्हरही छान होता.आम्हाला त्याने (बहुतेक थोडे पैसे जास्त घेऊन) परतताना थोडं सोलापुरही दाखवायचं ठरवलं होतं..पण आम्हाला मात्र पार्कात जायची घाई झाली होती..आता दुपारचं काही दिसणार नाही पण सकाळी लवकर मचाणावर गेलात तर माळढोक हमखास दिसेल बघा अशी पक्की खबर आमच्या फ़ॉरेस्ट ऑफ़िसर क्रमांक दोननी दिली होती..आम्हाला अर्थातच तेवढा धीर नव्हता..म्हणून जेऊन आम्ही निघालोच..निदान पार्क कसा आहे ते तरी बघू...वर म्हटल्याप्रमाणे सरळधोपट होतं..जी काही झाडं होती ती खुरटी आणि काटेरी प्रकारातली..बहुधा बाभळीच असाव्यात...रत्याने थोडं आत गेलं की एक छोटं आणि एक मोठं मचाण होतं...टेहेळणीला उत्तम होती..काही ठिकाणी पिवळसर झालेलं पण बरंच उंच वाढलेलं गवत होतं..माळढोकाला लपायला ही जागा चांगली होती असं वाटत होतं...एका बाजुला मात्र कुठल्या तरी सुबाभळीसारख्या परक्या आणि त्या मातीत एकदमच नकोशी झाडं मुद्दाम लावुन हिरवाई आणण्याचा (चुकीचा) प्रयत्न सुरु होता...सरकारी कारभार आणि काय?? मला वाटतं नंतर हे असे प्रयत्न बंद करण्यात आलेत पण पक्कं आठवत नाही...

दुपारची चक्कर म्हणजे एकदमच बेकार होती..काही म्हणजे काही दिसलं नाही...सरळ चहासाठी परत गेस्ट हाउसला आलो आणि मग रात्रीची जेवणाची वेळ होईस्तोवर आमच्यासारख्या एज्युकेटेड लोकांनी (म्हणजे मी आणि अल्पा) कसं साधं तिकीटही वाचलं नाही आणि रेल्वेला फ़सवुन वगैरे आलो याच्या चर्चा रंगल्या...एकदम बकरा झाला (किंवा बकर्‍या) झाला होता म्हणा नं...मी तर अल्पा सोडून सर्वांनाच प्रथम भेटत होते पण त्यादिवशी संध्याकाळी मात्र अगदी जन्मजन्मांतरीच्या मैत्रिणी असल्यासारखं कर्फ़्मटेबल झालो आणि नंतर अल्पा सोडली तर एकीलाही मी आजतागायत भेटले नाही ही वेगळी गोष्ट...

प्रवास आणि एकंदरित दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठायचंय याने रात्री लवकरच झोपलो आणि ठरल्याप्रमाणे लवकर म्हणजे साडे-सहा की सातलाच निघालो.मस्त सकाळच्या प्रसन्न वातावरणात काहीतरी दिसावं, काहीतरी म्हणण्यापेक्षा माळढोकच दिसावेत ही अर्थातच सर्वांचीच इच्छा होती.आमच्याबरोबर ते दुसरे फ़ॉरेस्ट गार्डपण आले होते कदाचित मुली-मुलीच आहेत म्हणून असेल किंवा जास्त लोक न येणार्‍या या जंगलात ते त्यांची जंगलाची जबाबदारी म्हणून जात असतील.पण असं कुणी सोबतीला असल्याचा माग काढायला फ़ायदाच होतो कारण आपण जंगलात नवखे असतो तर यांना अगदी चप्पा चप्पा माहित असतो...नमनाला एखाद-दुसरा पक्षी दिसत होता नाही असं नाही पण ज्याला शोधत होतो तो कुठे होता देव जाणे...


गाडी अगदी हळु जात होती..आणि एका ठिकाणी गवताच्या डोंगरात काहीतरी हलल्यासारखं वाटलं...गाडी थांबवुन सरळ बंद केली म्हणजे आवाजाने पळून जायला नको...तसेच स्तब्ध बसुन राहिलो आणि तीच ती राखाडी रंगाची मान आता नीट दिसली आणि मग तो ट्रेनचा कसाबसा केलेला प्रवास, काढलेली सुट्टी सार्‍याचं सोनं झालं....हाच तो मांस आणि अंड्याकरता बेसुमार शिकार झाल्यामुळे नाणजमध्ये कसाबसा जगवलेला "माळढोक",ग्रेट इंडियन बस्टर्ड उर्फ़ जी.आय.बी....तेव्हाही त्याचं अस्तित्व धोक्यात होतं किंबहुना म्हणून हे अभयारण्य अस्तित्वात आलं आणि अजुनही परिस्थिती तीच आहे असं ऐकतेय....दिसायला सुरुवातीला शहामृगासारखाच वाटणारा, काटकुळे पाय आणि डोक्यावरची काळसर टोपीसारखा भाग असा दिसणार आणि वजनदार असुनही उडू शकणारी ही पक्ष्यांची जात माणसांनी शिकार करुन आता जास्तीत जास्त हजारभर राहिले असतील..त्यात सध्या माळढोकात साधारण पंचवीसेक आहेत अशी माहिती आहे..त्यामुळे इथे आलं तरी ते हमखास दिसतीलच असं नाही...आम्हाला मात्र त्या मानाने लवकर दिसला असं आमच्याबरोबर असणार्‍या गार्डचं म्हणणं आहे...साधारण काळवीटांबरोबर ते असु शकतात अशीही टिप्पणी मिळाली...त्यादिवशी सकाळी त्याच गवतात काळवीटांचा एक मोठा कळपही चरत होता..कसला देखणा प्राणी आहे हा...एकदा दिसला की पाहातच राहावा...आणि आपली जाणीव होऊ दिली नाही तर तासनतास पाहू शकतो....तो त्याच्या राज्यात आणि आपण आपल्या...

पण आजचा आमचा लाडका कलावंत, माळढोक मात्र आम्हाला थोडीशीच झलक दाखवत होता त्यामुळे काळवीटांकडे तितकं लक्ष नव्हतं..पण आमच्या गार्डच्या सुचनांप्रमाणे आम्ही मागच्या बाजुने लपतछपत रस्त्यापासुन थोडं आत असलेल्या त्या दोनपैकी एका मचाणावर चढलो आणि मग काय लॉटरीच लागली, फ़क्त एकच साहेब माळढोक नव्हते तर एक फ़्यामिलीच होती...बच्चु तर इतका गोड होता की बास...आणि सूर्य उगवायला नुक्तीच सुरुवात झाली होती त्या उजेडात आणि मचाणावरुन मिळणार्‍या व्ह्युने दुर्बिणीची पण गरज नव्हती..फ़क्त त्यांची मर्जी आमच्यावर किती आहे त्यावर सारं अवलंबुन होतं...सक्काळ-सक्काळी गवताच्या बिया खायला म्हणून हे कुटुंब या गवताच्या डोंगरात आलं असावं...बराच वेळ त्यांचं खाणं आणि इथे-तिथे हळुवार फ़िरणं सुरु होतं आणि आम्ही मुग्धपणे ते पाहात होतं..आमच्यापैकी ज्यांच्याकडे कॅमेरे होते त्यांना अगदी आयुष्यभर जपुन ठेवावेत असे फ़ोटो मिळाले असणार...(माझ्याकडे अजुनही कॉपी नाहीये...Alpa do you read marathi by chance???) खाणं झालं तसं किंवा आता दिवसाची लगबग सुरु झाल्याची चाहुल लागल्यामुळे बहुतेक ते सारे उडून गेले आणि मग आम्ही भानावर आलो.

केवढातरी मोठा काळवीटांचा कळप तिथं चरत होता..दुर्बिणीतून त्यांनाही न्याहाळलं..बया,श्राइक,वेगवेगळ्या प्रकारचे लार्क आणि अन्य काही पक्ष्यांची लगबग सुरु झाली होती...थोड्या वेळाने आम्ही मचाणावरुन खाली आलो. पुन्हा रस्त्याने सरळ पुढं गेलो तर आणखी चांगले पक्षी दिसतील असं आमच्या गार्डचं मत होतं आणि त्यांनी आम्हाला इतकं सुरेख माळढोक दर्शन घडवल्यामुळे आम्ही आता त्याचं सगळं न ऐकतो तर नवलच...मग आणखी पुढे जाताना बरेच सुंदर पक्षी पाहिले जुनी लिस्ट आता माझ्याकडे असती तर मलाच आश्चर्य वाटल असतं की माळढोक सोडूनही काय काय पाहिलं ते...पण अर्थातच लक्षात राहणार होता तो माळढोकच...

सकाळची वेळ म्हणजे पक्षी-निरीक्षणासाठी तशीही अति-योग्य वेळ आहे..कारण पक्ष्यांना सारखं खायला लागतं, त्यामुळे रात्रभर उपाशी म्हणजे त्यांच्यासाठी खूप मोठ्ठं असतं..सकाळी-सकाळी बाहेर पडून काही पोटात घातल्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. असो..हे अर्थात सर्वांनाच माहित आहे...आमचं नशीब खरंच चांगलं होतं कारण गार्डनी म्हटल्याप्रमाण पार्काची हद्द संपल्यावरही आम्हाला एका ठिकाणी पुन्हा माळढोक दिसले, फ़क्त यावेळी ते चटकन उडून गेले...गावातही आता लोकांना माहित आहे यांना मारायचं नाही असं ते आम्हाला सांगत होते, खरं-खोटं गावकरीच जाणे.

मग पुन्हा गावाला वळसा घालुन आम्ही परत न्याहारीसाठी गेस्ट हाऊसला आलो...त्या काकांनी आधी म्हटल्याप्रमाणेच चविष्ट खाणं,चहा तयार ठेवला होता आणि आमचे प्रफ़ुल्लित चेहरे पाहून पैसा वसुल झाल्याचं त्यांनाही कळलं होतं..

त्यानंतर आमचं बुकिंग दुसर्‍या दिवसाचं संध्याकाळचं होतं बहुतेक म्हणून मग संध्याकाळी थोडं इतर एक-दोन ठिकाणी आमचा ड्रायव्हर आम्हाला घेउन गेला..एक त्याच्या ओळखीने कुठेतरी आतमध्ये सोलापुरी चादरींच दुकान की कारखाना होता तिथेही नेलं..खरेदी आटपली...दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा एक मचाणाची चक्कर मारली पण बहुतेक तेव्हा माळढोक नव्हते....नंतर मग निघताना सोलापुर स्टेशनच्या भागातलं एक जुनं, सुंदर देऊळ आणि असा थोडा परिसर आमच्या ड्रायव्हरने (त्याच्या आग्रहाने) आम्हाला भटकवला आणि मग (यावेळी तिकीटाप्रमाणे) ट्रेनमध्ये बसून पुन्हा सॉफ़्टवेअरच्या जगात मी परतले...पण सोलापुरच्या माळढोकांची गुंगी बरेच महिने होती आणि आत्ता सारं आठवुन लिहितानाही मी मनाने तिथेच पोहोचले आहे असं वाटतेय...बरीच ठिकाणं अशी असतात की तिथे आपल्याला पुन्हा-पुन्हा जावसं वाटतं पण ते शक्य होत नाही. नाणज असंच माझ्या लिस्टवर अजुनही आहे...पाहुया पुन्हा केव्हा योग येतो ते..



फ़ोटो सहकार्य...डॉ. संगिता धानुका आणि GIB गुगलबाबांच्या सहकार्याने

Friday, June 11, 2010

शिवडीचे रोहित


मला आठवतं पक्षीनिरिक्षणाचा छंद लागल्यापासुन रोहित उर्फ़ फ़्लेमिंगोचं मला जबरदस्त आकर्षण होतं..त्याचवेळी वृत्तपत्रात वाचुन मग एका वडाळ्याला राहणार्‍या मित्राबरोबर २००० च्या फ़ेब्रुवारीत जाऊन हजारोंनी फ़्लेमिंगो पाहुनही आले होते..अर्थात त्यावेळी कॅमेरा नव्हता पण त्याचं शल्यही नव्हतं. नंतर लगेचच साधारण सप्टेंबरमध्ये वगैरे वसई-नायगावच्या मध्येही ते दिसले हजारोंनी नाही पण दहाएक असावेत..नंतर देश सोडेपर्यंत प्रत्येक वर्षी ते तिथे दिसायचे..माझं आणि त्यांचं भेटीगाठीचं काही नातं असावं असे....मग २००५ मध्ये भारतात आले तेव्हा तर आईच्या त्यावेळच्या वसईच्या घराच्या मागेच वीसेक फ़्लेमिंगो काही दिवसांसाठी होते त्यांनाही खूप जवळून न्याहाळता आलं...


तसा हा पक्षी शांतता आणि समुहप्रिय. शांतपणे खाडीतल्या ओल्या मातीत आपली वक्र चोच बुडवून चमच्याप्रमाणे ढवळत राहतील नाहीतर चार-पाच एकदम उडतील..उडतानाचं दृष्य म्हणजे काय वर्णावं...त्यांच्या म्हणजे लेसर फ़्लेमिंगोच्या पंखातील लाल ठिपका मन मोहुन घेतो. आपण योग्य अंतर राखुन दुर्बिणीतून पाहात राहिलो तर तासनतास ते त्यांच्या राज्यात राहतील..

आता यावेळी मे महिन्यात कुठे फ़्लेमिंगो दिसतील असं म्हटलं तर मी ते उडवुन लावलं असतं पण राकेशने आणलेली माहिती अगदी पक्की असते. शिवडीला फ़्लेमिंगो आहेत तू भांडूपला असशील तेव्हा जाऊया असं तो म्हणाला तेव्हा माझे डोळे चमकले. मग काय एका गुरुवारी मुहुर्त काढलाच.

दोघंच दादरहुन टॅक्सी करुन गेलो आणि दुपारी दोनच्या टळटळीत उन्हात चांगले प्रहरभर तरी फ़्लेमिंगो पाहात बसलो. (खरं तर उभे होतो. तिथे बसायला जागाच नाहीये) निदान हजारभर असतील. त्यातले काही त्यातल्या त्यात जवळ होते; त्यांना पाहण्यासाठी तिथेच एका मालवाहु जहाजावर कसलं काम सुरु होतं त्यावर चढुन थोडे जवळुन फ़ोटो काढले आणि बराच वेळ निरिक्षणही केलं. दुपारच ऊन जाणवतही नव्हतं इतकी सावली त्यांच्या त्या लाल-गुलाबी पंखात होती. शिवडीच्या त्या खाडीवर रोहितांबरोबर इतरही पाणपक्षी पाहता येतात. आम्हाला ग्रीन हेरॉन, व्हाईट आयबीस, प्लोव्हर असे इतरही पाणपक्षी दिसले पण तरी त्या दिवशीचे स्टार मेहमान शिवडीचे रोहितच होते....

त्यांची ही फ़ोटोझलक.....



Tuesday, May 25, 2010

पार्कवाटा

चार आठवड्याच्या छोट्याशा मायदेश भेटीत नॅशनल पार्क हे टॉप लिस्टवर होतं पण कडाक्याचं ऊन आणि सोबत कुणी नसल्यामुळे प्रत्यक्ष जायला शेवटचा रविवार उजाडला. अर्थात SGNP ला जायला मी कधीही तयार असते.
साधारण साडे-सातला गेटवर राकेश आणि अर्चित भेटणार होते आणि आयत्यावेळी अर्चितचा मित्र अभिषेकही येणार असल्याचं कळलं.अर्थात त्याच्यासाठी न थांबता अर्चितने गाडी वेळेत आत घेतली हे बरं झालं.आता फ़क्त नेहमीसारखं तडक कान्हेरी की आणखी कुठे हे ठरायचं होतं. पण घाईगडबडीत आखलेल्या दौर्‍यात हा प्रश्न त्या दिवसाचं भविष्य जसा दिवस पुढे जाईल तसंच ठरतं.गप्पा मारत मारत गाडी पुढे जात होती आणि आम्ही जुन्या भटकंतीच्या आठवणीत रमत होतो.इथेच कुठे एका मचाणावर जायचो असं म्हणायला आणि गाडी कल्वेट नं. ६५ कडे पोहोचायला एकच गाठ पडली. मग काय आजचा पहिला डेरा तिथेच टाकायचं तिघानुमते ठरलंच.

डावीकडून आत जाणारी पार्कातल्या असंख्य "चलो, अंदर जाते है" कॅटेगरीतल्या अनेक पार्कवाटांपैकी ही वाट तशी बरीच मोठी आहे.सरळ फ़ॉलो केलीत तर मागुन मोराच्या माचीवरुन सरळ हायेस्ट पॉइन्टलाही जाता येतं असं म्हणतात. अर्थात त्याची शहानिशा करण्यासाठी आज तितका वेळ नव्हता हेही खरं.
आत येईस्तो जंगल बरंच शांत वाटत होतं. कदाचित उकाड्यानेही पाखरं चिडिचिप असावीत असं वाटुन काही दिसेल या अपेक्षेत आम्हीही नव्हतो.तरी आज नशीब भलतंच जोरावर होतं. गेल्या गेल्याच रॅकेट टेल्ड ड्रोंगोची (पल्लवपुच्छ कोतवाल हे चितमपल्लींच्या पुस्तकातलं त्याचं मराठी नाव छानच आहे नाही?) एक जोडी समोरच्याच झाडांवर पाठशिवणीचा (उर्फ़ पटवापटवीचा) खेळ खेळत होती. त्यांना दुर्बिणीतुन नीट न्याहाळतोय तोच डावीकडे खसखस ऐकु आली आणि झाडांवरतीही बरीच हालचालही दिसली. Red Whiskered Bulbul लगबगीत होते. दूरवर Indian Cuckoo ची सादही सुस्पष्ट ऐकु येत होती.

पुढे डावीकडे वाटेबरोबर वळलो तशी आमच्या आठवणीतलं मचाण तसंच उभं होतं आणि समोरच पाण्याचा छोटासा साठा पुर्वी या डुगडुगत्या मचाणावर चढल्याचं राकेशला आठवण करुन देत होता. आता बहुधा इथे नवं मचाण येत असावं. जवळच एक कोरा सांगाडा कामगारांची वाट पाहात झोपला होता. इथे बार्बेटचा आवाजही येत होता आणि थोड्याच वेळात त्याचेही जवळून दर्शन झाले.
थोडा वेळ ककुचा आवाज ऐकुन मग पुन्हा मागे वळून थोडंवर जाऊया असं ठरलं पण अर्चितचा जीव अभिषेकसाठी कासावीस झाल्याने तो एकटा परत गेटवर जाय़ला निघाला आणि मी व राकेश थोडं पुढे जाऊन परत यायचं ठरलं. तो निघतोय तितक्यातच राकेशने आमच्या सगळ्यात लाडक्या पक्ष्याच्या मादीला पाहिलं आणि अर्चितलाही पाय वळवावे लागले.Paradise Flycatcher ची मादी साध्या डोळ्यांना दिसेल अशी तिरप्या झाडावर बसली होती. तुम्ही आता नराला शोधा असं सांगुन अर्चित पळाला त्यामुळे आम्ही थोडं चढायला सुरुवात केली.
खरंच तो देखणा नर दिसला तर बरं होईल अशा विचारात होते तोच समोरच्या बाजुने डावीकडून उजवीकडे पळापळ झाली आणि दोन बार्किंग डिअर पळताना ओझरते दिसले. म्हणजे मघाशी त्यांचीच खसखस झाली होती वाटतं?
थोड्या वेळाने पुन्हा ख्यॅक ख्यॅक आवाजाने सतर्क झालो पण त्या बार्किंग डियरने आपल्या मित्रांच्या पाठी जायच्या ऐवजी रेंगाळणं पसंत केलं.तोवर हनुमान लंगुरही अलार्म कॉल देत होते त्यामुळेही ते जागरुक झालं असावं. मात्र आत आत जाताना सुकलेल्या झाडांमुळे निर्माण झालेल्या पोकळ्यांमुळे मात्र आम्ही त्या छोट्या पिलाला स्पष्ट पाहू शकलो.
अजुन थोडं वर जाताना आणखी एक फ़िकट भगव्या रंगाची पक्ष्यांची जोडी डावीकडे उडाली पण ते काय असावं कळणं शक्य नव्हतं. आता आम्हीही बर्‍यापैकी वर आलो होतो. आमच्यातली उरलेली जोडीही आमच्यापर्यंत पोहोचली नव्हती म्हणून आता आणखी वर जायच्या ऐवजी खाली उतरायचं ठरवलं.
खाली उतरताना मटका लागल्याप्रमाणे पक्षीगण दिसले. राखी धनेशाची जोडी उडून कान्हेरीच्या जवळ जात होती.तर हाकेच्या अंतरावर गोल्ड फ़्लेम्ड आणि आणखी एक वुडपेकर झाडाला फ़ेर्‍या मारत होते.हिरवेकंच क्लोरोप्सिस राकेश असला की अपॉइंटमेंट घेतल्यागत भेटतात आणि वाटेबरोबर सोबत करतात तसंच आजही झालं. आणि सूर्यदेव प्रसन्न झाल्याने सुर्यप्क्ष्यांची लगबगही न्याहाळता येत होती. शिक्राही कुणा पक्ष्याच्या पाठी लागत आमच्या डोक्यावरुन उडून गेला.

अर्ध्या वाटेवर अर्चित-अभिषेक भेटल्याने पुन्हा एकदा थोडं वर-खाली केलं यावेळी पुन्हा धनेशाची जोडी आणि Crested Serpent Eagle चा चित्कार कानावर आला. पुन्हा एकदा गाडीने कान्हेरीच्या पायथ्याशी गेलो पण या पार्कवाटेवर इतकं पाहुन झालं होतं की आज गुंफ़ांपर्यंत जायचं कुणीच नाव काढलं नाही आणि एकमेकांनी आणलेला खाऊ गट्टम करता करता पार्कवाटेचंच कौतुक परतीच्या वाटेवर होत राहिलं.

Tuesday, March 30, 2010

रानभूल...

’रानभूल’ हा शब्द आजवर अनेक जंगलाबद्दल लिहिलेल्या बर्‍याच खर्‍या आणि कल्पित कथांमध्ये भेटलाय..पण त्याआधी भेटलंय ते त्यातलं गडद, किर्र करणार जंगल....त्यामुळे आपण हा प्रकार फ़क्त पुस्तकातच अनुभवणार किंवा खरं तर असं काही नसेल अशा काही भाबड्या समजुतीत असतानाच एका मान्सुनमध्ये बी.एन.एच.एस.चा सिलोंडा ट्रेल जाहिर झाला...बी.एन.एच.एस.वाले प्रत्येक पावसाळ्यात एकदा तरी सिलोंड्यात घेऊन जातात त्यामुळे इतर वेळी वनखात्याच्या परवानगीशिवाय न जाणार्‍या विभागात जायला मिळतं शिवाय पावसाळ्यात सिलोंडयातले तिन्ही ओढे मस्त वाहात असतात, सगळीकडे गर्द हिरवाई पसरली असते आणि एकुण काय आपण मुंबईसारख्या एका मोठ्या शहरात उंडारतोय याचा नामोनिशान नसतो...
आतापर्यंत बी.एन.एच.एस.चे जवळजवळ सगळे गाईड निदान चेहर्‍याने तरी माहित झालेत किंवा थोडी मस्ती करता करताही सिरियसली बर्डिंग करणारा आमचा ग्रुप त्यांना माहित झाला आहे..काही का असेना ट्रेलच्या वेळी थोडी मुभा मिळते...म्हणजे थोडं इथे-तिथे उंडारलं तरी चालतं त्यावेळची ही गोष्ट आहे.....
आता आपण सिलोंड्यात काय नेहमीच येतो या मस्तीतच त्या दिवशी ओढा नं.२ पार केल्यावर जयेशच्या डोक्यात दुर्बुद्धी सुचली...(असले उद्योग करून गोत्यात आणायचं घाऊक कंत्राट त्याच्याचकडे आहे म्हणा...) "अरे आजचा ग्रुप (म्हणजे सगळा मोठा गोतावळा) जरा जास्त गडबड करणारा आहे...चलो जंगल में जाते है"...आम्ही काय? जंगल में म्हणजे किस झाड की पत्ती सारखं चला चला करुन बाकीच्या सगळ्यांना पुढे जायला दिलं आणि घुसलो उजवीकडे...

थोडा चढ होता पण शांतता होती...खरं तर बरं वाटत होतं..पावसाळ्यामुळे असेल बहुतेक पण पक्षीगण दिसले नाहीतच फ़ार पण हिरव्यागार जंगलातून मध्ये येणार्‍या वेलींना बाजुला करत कसे पुढे जात होतो कळतच नव्हतं...मध्ये पुन्हा एकदा ओढा लागला...आता जरा जरा भूकही लागली होती म्हणून पोटोबा केली..त्यादिवशी राकेशच्या आईने जवळजवळ सगळ्यांसाठीच मेथीचे ठेपले पाठवले होते त्यामुळे पहिले तर सगळे मुंगळ्यासारखे त्याच्याच डब्याच्या मागे धावले..नंतर मग इतरांनी आणलेल्या केळा वेफ़र्स, सॅंडविच, कुठे फ़ळ अशी सगळी भेळ पोटात गेल्यावर पुन्हा एकदा थोडं पुढे जाऊया असं ठरलं...मुख्य कारण एकतरी चांगलं सायटिंग झालं पाहिजे हे होतं आणि असं जेव्हा बर्‍याच परिघात पक्षी दिसत नाहीत तेव्हा काही वेळा एखाद्या ठिकाणी दोन-चार वेगवेगळ्या जातीचे पक्षी एकदम दिसायची शक्यता असते त्याला मिक्स हंटिंग पार्टी म्हणतात. तसलं काही असेल असं गाजर (अर्थातच जयेशनेच) दाखवल्यामुळे आगे बढोचा नारा होता......ती मिक्स हंटिंग पार्टी असायची तिथे असो पण आम्हाला काही दिसत नव्हती आणि अचानक कुणीतरी घड्याळ पाहायचा शाणपणा केल्यामुळे आता परत फ़िरायला हवंची जाणीव झाली...
परत ठिक आहे पण म्हणजे कुठे?? डावीकडे, ऊजवीकडे की सरळ मागे?? या मिक्स हंटिंगच्या शोधात कुणालाही दिशेची जाणीव होत नव्हती...पहिले उजवीकडे जाऊन पाहिलं तर वेलींची गर्दी वाढतच होती..शिवाय चढ आल्यासारखं वाटलं...नाही नाही चुकलंय...मग डावीकडे गेलं तर तीच आधीची झाडं आणि त्याला लगडलेल्या वेली सगळं सारखंच....चकवा...रानभूल...मारुती चित्तमपल्ली, व्यंकटेश माडगूळकर आठवायच्या मनस्थितीत नसतानाही आठवले आणि सुनीलला म्हटलं अरे आपल्याला जरा भूलल्यासारखं झालंय आणि आता निदान अजून आत आत नको जाऊया..पावसाळ्यात काळवंडलेल्या आभाळामूळे अंधार लवकर पडतो आणि सिलोंड्यात वगैरे तर तो लगेच जाणवतो त्यामुळे आता अडकलो तर काय?? सगळीच जण थोडी थोडी घाबरली होती पण तरी एकमेका सहाय करुच्या तत्वाने शेवटी कसाबसा तो दुसर्‍यांदा मिळालेला ओढा मिळाला..मग तो पार केल्यावर बाकीच्या झाडं, तुटलेले ओंडके असं काहीबाही आठवून सिलोंडाच्या मुख्य ओढ्यावरुन एकदाचे ट्रेलवर आलो..
मूळचा ग्रुप कधीच घरी गेला असावा..सारं सिलोंडा चिडीचूप होतं..
एकदा रस्ता दिसल्यावर सगळीच जण पुनश्चः बडबड करायला लागले पण याआधीची दोनेक तासांची रानभूल एक वेगळाच थरारक अनुभव देऊन गेली आणि तेही चक्क मुंबईच्या नॅशनल पार्कात...

फ़ोटो..साभार डॉ.संगिता धानुका

Tuesday, February 2, 2010

फ़ुलपाखरं आली सहलीवर....

असाच एक २००० मधला मान्सुन मधला ट्रेल होता आणि यावेळी बी.एन.एच.एस. ने खास WWF( World Wide federation) बरोबर संधान बांधुन त्यांचे दोन-तीन एक्सपर्ट बोलावले होते. बोरीवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये खास फ़ुलपाखरांची शास्त्रोक्त पद्धतीने पाहणी होणार होती. इतर वेळी पक्ष्यांच्या पाठी पळणारा आमचा ग्रुप त्यादिवशी नक्की काय पाहायला मिळणार याबद्द्ल थोड्या शंका, थोडा उत्साह अशा संमिश्र भावना मनात घेऊन गेटवर उभा होता. आणि पाहिलं तर अगदी तोबा गर्दी झाली होती. असा सॉलिड मोठा ग्रुप झाला की त्याचे फ़ायद्यापेक्षा तोटेच जास्त असतात.. म्हणजे गोंगाट जास्त, त्यात नवशे असतील तर मग फ़ुकटची बकबक आणि जंगलात काही दिसणार असेल तर तेही या गर्दीमुळे दिसण्याची शक्यता दुरावते म्हणून हा भला मोठा ग्रुप पाहून आम्ही जरा हिरमुसलोच होतो आणि मुख्य फ़ुलपांखर पाहण्याबाबतचं आमचं ज्ञान यथातथाच होतं. तरी बरं पावसाळाच होता आणि मुख्य पावसाळ्यात खूप पक्षी पाहायला मिळत नाहीत. पावसाळ्यात पाहायची ती हिरव्या शालुत नटलेली सृष्टी, जंगलात तयार झालेले छोटे छोटे ओहोळ, त्यातुन सारखं रस्ता क्रॉस करणारे खेकडे आणि एखादा पाऊस कम सूर्यप्रकाश असं कॉम्बो असलं की दिसणारी फ़ुलपाखरं.(हे आताच मिळालेला पहिला डोस)
wwf वाल्यांना बहुतेक अंदाज असेल म्हणून त्यांनी त्यांच्यातर्फ़े बर्‍यापैकी लोकं (म्हणजे किती ते प्लीज आता आठवत नाहीये...) आणली असावीत कारण दहा-बारा लोकांना एक मार्गदर्शक असं त्यांना करता आलं होतं. आमचा ग्रुपही या भानगडीत थोडा विभागला गेला पण ठीकये तेही..नाहीतरी आमच्यातली पण काही जास्त शहाणी मुलं, ज्यांचं जंगलातलं आमच्या एक पाऊल पुढे होतं, त्यांचा कधीतरी बेसिक शिकताना त्रास व्हायचाच त्यामुळे ती खंत नव्हती आणि मुख्य म्हणजे wwf चे मार्गदर्शक जेव्हा हे ग्रुप्स पाडत होते तेव्हा त्यातली आम्हाला सगळ्यात आवडलेली व्यक्ती (आवडलेली म्हणजे पाहताक्षणीच काही व्यक्ती आवडतात त्यातली...ह्म्म्म्म्म्म्म...म्हणजे क्रश म्हटलं तरी चालेल तसं..जाऊदे भरकटत नाही फ़ुलपाखरांसारखी) तर तिच आमच्या दहा-बारांच्या समुहाची लीडर होती..मिस्टर आपटे, (डोक्याला जाम ताप दिला तरी फ़क्त आडनावच आठवतय सध्या जाऊदे नावात काय???) पाच आठच्या आतबाहेर उंची आणि एकदम टिपिकल कोब्रा गोरा रंग आणि सॉलिड हॅंडसम आणि तितकंच फ़ुलपाखरांच्या दुनियेतला बाप माणूस (हे मागाहून कळलं), अगदी प्रसन्न व्यक्तिमत्व. पावसाळ्यात अशा लोकांबरोबर जंगलात जावं, पक्षी नाही दिसले तरी...जाउदे अति होतंय....
सुरुवात केली आम्ही गेटपास्नंच आणि तो पहिला डावीकडचा छोटा लेक गेला की उजवीकडे पुन्हा नदीचं वळण लागतं त्या रस्त्यावर आम्हाला सगळ्यात कॉमनली दिसणारं प्लेन टायगर सरांनी दाखवलं. आतापर्यंत अंडी, अळी, कोष, फ़ुलपाखरू इतकंच माहित होतं..या ट्रेलमध्ये मात्र या व्यतिरिक्त फ़ुलपाखरांची भरपूर माहिती मिळायला सुरुवात झाली. फ़ुलपाखरं दाखवुन त्यांची जात, सवयी इ. माहिती सांगणं पक्ष्यांच्या तुलनेत थोडं सोप्पं आहे कारण ती आपल्या आजुबाजुला भिरभिरत असतात. शिवाय आपण जरा शांत उभे राहिलो की ती एखाद्या फ़ुलावर निश्चिंत बसलेली आपण त्याहुन निश्चिंत डोक्याने पाहुही शकतो. आतापर्यंत फ़क्त फ़ुलपाखरू हा एकच शब्द माहित होता पण त्यात किती विविध जाती असतात आणि त्यांच्या काय काय सवयी असतात; तसंच काही फ़ुलपाखरं चक्क मांसाहारीसुद्धा असतात अशी सगळी माहिती त्यादिवशी त्या दोन-तीन तासांमध्ये आपटेसरांकडून मिळाली.
जसजसं पुढं हळूहळू चालत राहिलो तसंतसं सिलोंडाचा गेट येईपर्यंत साधारण तीसेक प्रकारची तरी फ़ुलपाखरं आम्ही पाहिली असतील. नेहमी सिलोंड्यात जाऊन पक्षी पाहायचे असतील तर जास्तीत जास्त तीस-चाळीस मिनिटं आम्हाला लागतात पण त्यादिवशी सरांबरोबर दोनेक तास कसे गेले कळलंच नाही. फ़ुलपाखरांची त्यांनी सांगितलेली सवय म्हणजे सुर्यप्रकाश जसजसा वाढतो तसतशी ती जास्त ऍक्टिव्ह व्हायला लागतात जे अजुनही आठवतंय..बर्‍याच आठवणी आहेत ज्या आता जास्त स्पष्ट नाहीयेत पण इतकं खरं की निसर्गात किती विविध गोष्टी आहेत आणि त्या सगळ्या माहित करून घ्यायला हा जन्मच अपुरा पडेल असं काहीसं मनाचं त्यावेळी झालं होतं. फ़ुलपाखरांची रंगिबेरंगी दुनिया शोधण्यासाठीचं पहिलं पाऊल उचलण्यात हा ट्रेल फ़ार महत्वाचा होता.

नंतर जेव्हा जेव्हा आम्ही पक्षी पाहायला गेलो तेव्हा तेव्हा आसपास भिरभिरणारी रंगीबेरंगी फ़ुलपाखरंही पाहायची सवय लागली. आणि काही काही वेळा तर उगाच आम्ही "टायगर" पाहिला असं सांगुन समोरच्याची विकेट घ्यायची संधीही अधुनमधुन साधली. ग्रेट ऑरेन्ज टिप मुख्यत: पांढरं पण पंखाचा खालचा भाग शेंदरी असं अतिशय देखणं आणि तितक्याच देखण्या नावाचं फ़ुलपाखरू, प्लेन टायगर, चॉकलेट पॅन्सी, पीकॉक पॅन्सी, पेंटेड लेडी, डॅनाईड एग, कॉमन मॉरमॉन, येलो ऑरेन्ज टिप, अशी भरपुर नावं त्यादिवशी चेहर्‍यासहित कळली. पुन्हा अशी संधी मिळाली तर अजुन माहिती गोळा करायला नक्की आवडेल. फ़ोटो काढायलाही आवडतील पण आताचे हे फ़ोटो साभार माझी एक मैत्रीण संगिता धानुका हिच्यातर्फ़े......(या ब्लॉगसाठी तिचे फ़ोटो मोठ्या उदार मनाने द्यायची तिने तयारी दाखवली आहे..)

Wednesday, January 13, 2010

या नयनी मृग पाहिले मी...

थ्री इडियट्स पाहिल्यानंतर इंजिनियरींगचे दिवस आठवले..का माहित नाही पण मला इंजिनियरींगचं शेवटचं वर्ष जवळ येईपर्यंत इतका कंटाळा आला होता कदाचित डिप्लोमामार्गे डिग्री हा द्राविडी प्राणायाम केल्यामुळेही असेल..पण शेवटी शेवटी मी कॉलेज लाइफ़ला पर्याय म्हणून माझा निसर्गभ्रमंतीचा ग्रुप असं केलं होतं..नंतर नोकरीला लागल्यावर ते जास्त बरं झालं कारण नोकरीतले कॉन्टॅक्स परत विकेन्डला?? बापरे कल्पनाच करवत नाही..तिथेही टिम-मिटिंग नाहीतर पिअर रिव्ह्यु असलं काहीतरी बोलत बसले असते..खरंच याबाबतीत मी फ़ारच नशीबवान आहे, त्यामुळे शेवटच्या वर्षापासून का होईना माझ्या दैनंदिन कामाशी संबंधीत नसलेल्या मित्र-मैत्रीणींबरोबर मी जंगलात जायला लागले..त्यामुळे मला ख~या अर्थाने ब्रेक मिळे. आमच्या ग्रुपमधले सगळे जण वेगवेगळे अभ्यास आणि कामं करणारे होते त्यामुळे जी काही बोलणी होत ती फ़क्त आम्ही त्यादिवशी काय पाहिलं किंवा तत्सम विषयावरचीच असत...असो नमनालाच घडा भरला तेलाने..काय आठवलं होतं बरं??? :)
हां...तर शेवटचं वर्ष...शेवटच्या वर्षाच्या तोंडी परिक्षा सुरू होत्या म्हणजे परिक्षा जवळजवळ संपल्याच होत्या..ग्रुपमधल्या बाकी एक दोन टाळक्यांनाही वेळ असणार होता म्हणून आम्ही प्रथमच संध्याकाळी नॅशनल पार्कला जायचं ठरवलं. आजवर जे काही जायचो ते सात वाजता भेटून मग दुपारपर्यंत भटका असंच. पण यावेळी थोडा बदल करायचा प्रयत्न होता.सर्वांनी ठरवलेली वेळ होती चार वाजेपर्यंत.
गेटवर चार वाजता परिक्षा संपवून जाणं मलाही सहज शक्य होतं.आमच्यापैकी जयेशकडे गाडी होती. मला वाटतं त्याच्या बाबांनी त्यांची जुनी फ़ियाट त्याला वापरायला दिली होती. ही गाडी नंतर आमच्या नॅशनल पार्कच्या बर्याच ट्रेल्समध्ये होती आणि नंतर नंतर तिला प्रत्येकवेळी एकदातरी धक्का मारायला लागायचा त्यामुळे आम्ही त्याला जयेशचा डब्बाच म्हणायचो. तो कधीमधी चिडायचा पण त्याचीच काय आमची सर्वांचीच ती लाडकी होती..बापरे ही पोस्ट म्हणजे आठवणींचं जंगल होणार आता...जाऊदे या ब्लॉगमध्ये तसंही सगळ्या आठवणींचीच स्पर्धा असणार आहे.


तर गाडी असल्यामुळे कान्हेरीपर्यंत जावं असा बेत होता. कान्हेरीच्या मागे डोंगर आहे तिथे एका ठिकाणी मोर दिसतात अशी पक्की माहिती पण होती आणि अजून सरता मे होता म्हणजे येणा~या पावसाळ्यासाठी मोर तिथं नक्की येणार या उद्देशाने आम्ही सहा जण गेटवर भेटलो. नितीन, आराधना, मी, जयेश, राकेश आणि मला वाटतं सुनिल (सहावा नक्की आठवत नाही) होतो. पुढे तीन मागे तीन असे आम्ही पार्काचं तिकीट काढून गाडी आत घातली. उन्हं अजून वर होती. माझ्या मामाकडे जाताना आम्ही रस्त्यात लागणा~या गावदेवीला नेहमी नमस्कार करूनच पुढे जातो तसंच नॅशनल पार्कमध्ये कुठेही गेलो तरी सिलोंडाला थोडं वळल्याशिवाय आमचं घोडं पुढे जात नाही.....यावेळी गेलो तर चक्क सगळ्यांनी नाही म्हटलं मला कारण तिथे आता सेफ़ नाही असं म्हणतात (एकतर फ़ॉरेस्ट ऑफ़िसरनी पकडलं तरी किंवा कुणा टारगट कंपुच्या तावडीत सापडलो तरी म्हणून बहुतेक...) पण म्हणजे तोपर्यंत तरी आम्ही सिलोंडाला आमचा पार्कदेव करुन ठेवला होता. त्याप्रमाणे गाडी बाजुला घेऊन सिलोंड्यात एक छोटी चक्कर मारली. एक-दोन बॅबलर्स काय ते दिसले पण बरं वाटलं. मग आता कान्हेरीत जाऊया म्हणून जरा लवकर निघालो कारण कायद्याप्रमाणे काहीतरी सहा वाजता पार्काच्या बाहेर पडायचं असतं असं म्हणतात. त्यातल्या त्यात कान्हेरीचा पहारेकरी त्यावेळेला जरा हिंडूनफ़िरून, हाकारे देऊन सगळ्यांना बाहेर काढतो. त्यामुळे थोडा वेळतरी तिथे मिळायला हवा होता.


सिलोंडातून बाहेर आलं की पुन्हा मुख्य रस्त्याला एक दोन मिनिटांत आपण पोहोचतो आणि मग संध्याकाळची जंगलाची शांतता सुरू झाली. आम्ही सगळीजणं अगदी शांतपणे ती अनुभवत पुढे जात होतो..खरंच विश्वास बसत नाही की आपण भारताच्या आर्थिक राजधानीतच आहोत, शहराचा गोंगाट अगदी एखाद मैल पलीकडे आहे आणि इमारतींचं जंगलही खूपच जवळ आहे. मेमध्ये पार्कातलं जंगल जरा हिरवळ कमी झाल्यामुळे रिकामं रिकामं असतं.रस्त्याच्या बाजुला नजर वळवली तर मिठी नदीचा ओहोळ आणि त्यापलीकडच्या झाडांतलं ब~यापैकी दिसतं. तसंच तेव्हाही होतं. गाडी मध्ये एक जंगल खात्याचा दांडी पाडून बंद करायल येईल असा गेट आहे (तिथे परत गाड्यांची तिकिटं तपासली जातात) त्याच्या जरा अलीकडे होती आणि मी डाव्या बाजुला बसते होते त्याच बाजुच्या झाडीमध्ये काहीतरी हालचाल मला दिसली. मी जरा जास्तच किंचाळून जयेशला गाडी थांबवायला सांगितलं. गाडी थोडी पुढेच गेली होती कारण काय झालंय कुणालाच कळलं नव्हतं.
मग गाडी जरा रिव्हर्सला घेतली तर माझ्यासारखेच सगळे आनंदाने चित्कारले..संध्याकाळच्या वेळी जंगलात चरायला आलेल्या ठिपकेवाल्या हरणांचा एक कळप रस्त्याच्या जवळपासच्या झाडीत जवळच होता. नीट पाहिले की एक शिंगावाला नर, चारेक माद्या आणि दोन छोटी पिल्लं होती. आम्ही गाडी जरा मागं लावली आणि मग आमच्या पूर्ण ग्रुपमध्ये असलेल्या एकुलत्या एक दुर्बिणीने एकापाठी एक त्यांना गाडीमागे लपून बराच वेळ पाहून घेतलं. नितीनकडे कॅमेरा होता त्याने फ़ोटोही घेतले. त्यातल्या एका मादीचं थोडं आमच्याकडेही लक्ष होतं. पण एकतर इथल्या हरणांना थोडंफ़ार सवय असावी किंवा आमच्यापासून धोका नाही हे तरी जाणवलं होतं.


पुन्हा गाडीत बसताना माझं तरी ’आज मै उपर आसमान नीचे’ असं झालं होतं.. अरे कशाला का?? माझ्या आयुष्यात मी स्पॉट केलेला जंगलातला पहिलावहिला कळप...स्पॉटेड डिअर. बोरीवलीच्या नॅशनल पार्कात तशी ब~यापैकी आहेत. पण ती त्यांना असं मनमोकळं नैसर्गिकपणे पाहण्याची ही पहिलीवहिलीच वेळ.त्यावेळी अंगावर आलेले रोमांच आणि ती अत्यानंदता वेगळीच. जंगलात असे रोमांचक क्षण जितके जास्त वाट्याला येतात तितकं आपलं जंगलात भटकंती करायचं वेड अजूनच वाढतं. त्यादिवशी नंतर कान्हेरीला आम्हाला विशेष काही दिसलं नाही. मोरांचा पण नुसता आवाजच ऐकू आला.पण तरी परत जाताना प्रत्येकजण एका नव्या आनंदात होता. पार्कात संध्याकाळचं असंच अधुनमधुन यावं असं सर्वानुमते ठरलं. पुन्हा सारखं सारखं नाही पण अधेमधे गेलोही पण पहिल्या फ़ेरीच्या वेळी पाहिलेली हरिणं आणि तो आनंद आमच्यापैकी प्रत्येकाच्याच मनावर वेगळा कोरला गेला आहे.
कधीतरी दूरदेशी उदास बसले असताना मध्येच ग्रुपमधलं कुणीतरी स्क्रॅप करतं ’अगं आज स्पॉटेड डिअर दिसलं, तुझी आठवण आली’ की वरचा प्रसंग आपसूक डोळ्यापुढे उभा राहतो आणि पुन्हा ते थ्रिल अनुभवते अगदी ही पोस्ट लिहिताना वाटतंय तसंच.

Friday, January 8, 2010

प्रथमा...

जंगल भटकंतीची आवड तशी माडगुळकर, चित्तमपल्ली आणि अशाच अनेक लेखकांच्या पुस्तकांप्रमाणे लागली पण प्रत्यक्ष मात्र कुठे जायचं, कसं जायचं आणि मुख्य म्हणजे कोणाबरोबर..(मुलगी असल्यामुळे हा यक्षप्रश्नच) हा मोठाच प्रश्न होता. पण सुदैवाने बहुतेक १९९७ मध्ये ठाण्यामध्ये ओवळा येथे एक पक्षिमित्र सम्मेलन भरणार होतं आणि त्याची फ़ी तशी परवडणारी होती. माझी एक मैत्रीण भारती जिला खरं पक्षीनिरीक्षणामध्ये तसा काही रस नव्हता पण मुंबईतल्या मुंबईत बदल म्हणून ती चटकन हो म्हणाली आणि त्या सम्मेलनाला तीन दिवसांसाठी सगळ्या अट्टल पक्षीमित्रामध्ये मी नवशिकीही सामिल झाले. आम्ही दोघींनी त्या सम्मेलनात जमेल तेवढी धमाल केली. मुंबईतल्या लोकांकडून त्यावेळी सारखं बी.एन.एच.एस. हे नावही ऐकलं आणि सारखं वाटलं की आपल्याला जर हे शास्त्रशुद्ध जमवायचं असेल तर हा हॉर्नबिल हाऊस शोधलंच पाहिजे..
त्यात काय मुंबई आहे घ्या पत्ता आणि शोधा असं इतकं सोपसं वाटणारं हे प्रकरण खरंखरं शोधायला मला मध्ये एक-दिड वर्षे तरी गेली.एकतर इंजिनियरिंगचं विचित्र श्येडूल (म्हणजे सुट्ट्यांच्या बाबतीत) आणि त्यात टाउन साईड म्हणजे त्याकाळात लांब कुठेतरी असंच एकटं कसं निघायचं, घरची सोडतील का असे सगळे प्रश्न तर होतेच आणि एकदा प्रयत्न केलाही होता पण चर्चगेटवरून कसं जायचं ते कुणी नीट सांगेना. त्यामुळे एकदा माझे एक आय.आय.टी. मधुन शिकलेले आणि आता स्वतःची छोटी फ़ॅक्टरी असणारे सर कम मित्र यांच्याबरोबर बी.सी.एल.ला जायचं झालं तेव्हा त्यांनी माझा प्रश्न चुटकीसरशी सोडवला.


आणि खरंतर त्यांनी हॉर्नबिल हाऊस मला दाखवलं तेव्हा त्याला एक वळसा घातल्यावर माझं मलाच हसायला आलं कारण आपलं मुंबईचं ते प्रसिद्ध प्रिन्स ऑफ़ वेल्स म्युझियम आहे ना त्यांच्या बरोबर पाठीला पाठ लावून हे धनेशाचं घर आहे..म्हणजे खरंतर म्युझियमचाच भाग यांना वापरायला दिलाय. कुणी त्या ऍड्रेसमध्ये जर म्युझियमचा उल्लेख लॅन्डमार्क म्हणून केला असता तर मला त्या सरांना उगाच त्रास नसता द्यावा लागला. तर असो..शुभस्य शीघ्रम..लगेच त्यांची वार्षिक वर्गणी भरून छान छान पक्षी पाहायला जायचं अशी स्वप्न रंगवत घरी आले. हे बी.एन.एच.एस. शोधणे आणि त्यांची मेंबरशीप घेणे यासाठी माझ्या बाबांनी मला इतका छान सपोर्ट दिला की त्यांनी जर पाठबळ दिलं नसतं तर मग एक मुलगी, लांब पडतंय, काय सारखं सारखं जंगलांत अशा आईच्या प्रश्नांना मला अजिबात सांभाळता आलं नसतं....
तर एकदाचं बी.एन.एच.एस.चं पत्रक आलं ज्यात मला जमण्यासारखा एक नेचर ट्रेल होता बोरीवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कात (त्याला आता फ़क्त एस.जी.एन.पी.च म्हणतो आमचा ग्रुप म्हणजे काही नाही वेळ वाचतो कुठे भेटायचं हे सांगायला). ती ९९ च्या मान्सुनची सुरुवात होती त्यामुळे इंजिनियरींगच्या सुट्ट्याही सुरू होत्या. घरातून कुणी आडकाठी करायचा प्रश्न नव्हता कारण दिवसा ढवळ्या जाऊन दुपारी परत असं लिहिलं होतं..

उशीर नको म्हणून वेळेच्या आधीच गेटवर पोहोचले. माझ्यासारखाच गेटवर अजुन एक मुलगाही थांबला होता. इतर काही टोळकी आपापल्या कंपु मेंबरची वाट पाहात होती. होता होता बरीच टोळकी मध्येही गेली..अजुन काही डोकी एकत्र व्हायला लागली पण हे बी.एन.एच.एस. वाले कुठं आहेत काही कळेना म्हणून मग त्या पहिल्यांदी पाहिलेल्या मुलाला (तोही माझ्यासारखाच थांबला होता म्हणून) विचारलं की बाबा तू पण बी.एन.एच.एस. च्या ट्रेलसाठी आलास का?? हो..नशीब ग्रुपलीडर नाही तर कुणी ग्रुपवाला भेटला म्हणून त्याच्याच बाजुला थांबले. अगदी मोजकं आणि शक्यतो पक्षी आणि अशाच गोष्टींबद्द्ल बोलणारा माझा पहिला वहिला मित्र ’राकेश’ हा मला अशा प्रकारे भेटला. त्यावेळी अर्थातच तो फ़ार काही बोलला नाही पण ओळख झाली.त्यानंतर थोड्या वेळाने एका मुलीने माझ्याशी ओळख करून घेतली ही आमची "आराधना".मग असेच अजून जयेश, नील, लोऑन आणि काही लोकं गोळा व्हायला लागले...आम्ही बरेच जण बी.एन.एच.एस.साठी प्रथमच येत होतो... तर राकेशने, आता याचा राक्या झालाय...इतर एक-दोन टोळक्यांना विचारून ट्रेलमधले बाकी सवंगडीही गोळा केले पण पत्यातले भिडू गोळा झाले पण हुकुमाच्या एक्क्याचा पत्ताच नव्हता. मग कुणीतरी जुन्या मेंबरने कुठे कुठे फ़ोन करून आम्हाला माझ्यासाठीची दुःखद बातमी दिली की काही कारणाने ग्रुप लीडरला येता येणार नाही म्हणून मग ट्रेल कॅंसल...श्या काय बी.एन.एच.एस. आहे?? मी आणि माझ्यासारखे बरेच नवशिके म्हणाले.." इनका आजकल ऐसे होता है" अजून एक नकोशी कॉमेन्ट...आयला कुठल्या मुहुर्तावर जॉइन केलं?? घरी जाऊन पोपट..माझा आणि बाबांचा..
पण इतर काही जणांच्या सुपीक डोक्यातून आता आलो आहोत तर स्वतःच जाऊया म्हणून कल्पना आली आणि चला चला म्हणून आम्ही एकदाचे नॅशनल पार्कमध्ये घुसलो...आधी शाळेत असताना आलेलं नॅशनल पार्क म्हणजे आठवतही नव्हतं कसं जायचं, कुठे काय पण नेहमी येणार्या मंडळींमुळे हा प्रश्नच पडला नाही. सरळ कान्हेरीच्या रस्त्याला चालायला लागायचं आणि मग जे ज्या ज्या क्षेत्रात रस घेणारे होते त्यांनी त्यांचं जंगल नॉलेज नवशिक्यांना वाटायला सुरूवात केली. कुणी झाडांची माझ्या डोक्याच्या संपुर्ण वरुन जाणारी (अजुनही ती नावं वरूनच जातात पण जाता जाता आधी ऐकल्याचं ओळखीचं हसू देऊन जातात) नावं, कुणी किटकांची लांबलचक नाव देतंय..मी बापडी स्वतः चुपचाप राहून चालत होते..अहो तोंड उघडण्यासारखं काही माहित पण असायला हवं ना??


नशीब त्यातल्या त्यात गेटजवळचा नेहमीचा (नेहमीचा आता तेव्हा अरे वा शुभ आणि यॉंव..)भारद्वाज दिसला. तसंच, पार्कातल्या छोट्या तलावात डॅब-चीक, हेरॉन, मुरहेन, खंड्या असे पक्षीगणही दिसले होते त्यामुळे माझं पक्ष्यांबद्दलचा रस वाढत होता..आमच्या पैकी आराधनाला झाडांबद्दल खूपच माहिती होती आणि राकेश आणि जयेश पक्ष्यांना पटापट ओळखत होते. आपण खूप बच्चू आहोत असं जरी वाटलं तरी ते माहित होतं आता फ़क्त योग्य संगत मिळावी आणि देर ही सही पण आपल्या आवडीला जोपासावं यासाठी हा ट्रेल आमचा आम्ही केला ते माझ्यासाठी खूपच बरं होतं.


कदाचीत जो कुणी लीडर होता त्याने नेलं असतं आणि मग हवं तसं थांबता नसतं आलं किंवा त्याने फ़क्त झाडं किंवा किटकच दाखवले असते तर?? अर्थात तसं होत नाही पण उगाच या सगळ्या तेव्हाच्या कुशंका....त्यानंतरच्या ट्रेलमध्ये कळलं की ही वरची पक्ष्यांची यादी तर नॅशनल पार्कातल्या पहिल्या दहा मिन्टांत होतेच पण खरे पक्षी नंतर आत आत गेले की दिसतात. असो. तर त्या दिवशी मग दुपारी काही जण कान्हेरीपर्यंत पुढे गेले. मी मात्र घडाळ्याच्या हिशेबाने आराधनाबरोबर परत फ़िरले. परतीच्या वाटेवर माझ्याकडे या जंगल जगात माझ्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेले आणि माझ्या दैनंदिन जिवनाशी अजिबात निगडीत नसलेले अनेक नवे मित्र मला मिळाले होते.


आता यापुढे आपणही असंच त्यांच्यासारखं चांगली दुर्बिण (जेव्हा जमेल तेव्हा घेऊन) मस्त पक्षी पाहात रानोमाळ हिंडणार या विचारानेच परतीचा रस्ता कधी संपला आणि पुन्हा एकदा ट्रेनच्या गर्दीत कधी शिरलो कळलंच नाही. ये पुढच्या वेळी नक्की फ़ोन करुन ठरवू हं?? आराधनाला टाटा करताना म्हणत होते..माझ्याकडे स्वतःचा फ़ोन नंबर नसल्याचं मला प्रथमच इतकं वाईट वाटत होतं....
या छोट्या ट्रेलमुळे मिळालेले माझे हे मित्र मी भारतात असेपर्यंत जंगल भ्रमंतीसाठी कायम सोबतीला होते आणि आता जाते तेव्हाही मला पुन्हा त्या जगात घेऊन जातात.आणि त्यामुळे त्यादिवशीचा बी.एन.एच.एस.चा जो कुणी टिम लीडर होता तो न आल्याबद्दल या पोस्टमध्ये त्याचे खास आभार.

Thursday, January 7, 2010

पुनश्च:गणेशा...

सध्या माझ्या बर्याच ब्लॉगर मित्रमैत्रीणींनी सहजच त्यांच्या मनातलं सांगितलं आणि ते म्हणजे आता त्यांना ब्लॉगवर नियमितपणे लिहिता येणार नाही..त्यानंतर मग जिवनिकेने अगदी योग्य शब्दात त्यांना समजावलंही आणि ती पोस्ट वाचताना मला आठवलं की ही लोकं निदान छान छान पोस्टस लिहून तरी निवृत्तीचे संकेत देतात पण मी मात्र अगदी (बहुतेक उसन्या) उत्साहाने चालु केलेल्या या भटकंती ब्लॉगचं मी काय करुन ठेवलंय?? नव्याचे नऊ पण नाही फ़क्त दोन पोस्ट्स?? छे ते काही नाही यावर्षात या ब्लॉगवरचा आळसही थोडा झटकला पाहिजे नाही का??
खरं सांगायचं तर या ब्लॉगची सुरूवात केली त्याची मूळ कारणं दोन एक म्हणजे पहिली पोस्ट आहे ती मला कुणीतरी वाचून त्यावर विचार करावा असं जाम वाटत होतं आणि कुठच्या वर्तमानपत्रात ते छापायला वगैरे द्यायचं का हे ठरवायच्या आधीच मी परतीच्या प्रवासाला निघाले मग ते राहून गेलं आणि दुसरं दिपक माझा मित्र ज्याचा ब्लॉग सगळीच वाचतात नेहमी म्हणायचा की तू पण एक ब्लॉग सुरू कर, एकदा सुरू केलं की लिहिलं जातं इ.इ. तेव्हा मग मलाही वाटलं की जे काही आपण भटकलोय त्याच्य आठवणी खरंच लिहील्या पाहिजेत म्हणून मग चालू केलं आणि पोस्ट नं. २ लिहिल्यानंतर बास...असं कसं...
म्हणजे त्याचं काही नाही फ़क्त मी फ़ार्फ़ार पूर्वीच बाबांच ऐकलं असतं तर या ब्लॉगवर टाकायलाही बरंच काही मिळालं असतं पण ....जाऊदे...नेहमी म्हणतात (अजुनही),"अपर्णा, तू जिथे जातेस त्या जागांबद्दलचे अनुभव लिहून ठेवत जा".त्यांचं ऐकून फ़क्त सागरगडाबद्द्लच लिहीलं होतं ते तसच्या तसं उतरवलं आणि पुन्हा पाढे पंचावन्न...असो...आता आतापर्य़ंत या ब्लॉगवर कॉमेन्ट आली होती की हा ब्लॉग असा उदास का? म्हणून घोळत होतं मनात..पण आज रोहनच्या सप्त शिवपदस्पर्श वाचल्यावर असं वाटलं की अगदी त्या पातळीवरचं नाही पण थोडंफ़ार जुनं आठवून पाहायला काय हरकत आहे??
असं म्हणतात की शेंडेफ़ळाचे लाड जास्त होतात म्हणून माझिया मनाचे लाड जास्त आय मिन पोस्ट्स जास्त झाल्या का? पण आईला सगळी मुलं सारखी तसं हे मोठंही या वर्षी थोडं अजून मोठं करूया असं ठरवतेय..अर्थात हा निग्रह नाही पण बघुया किती आठवतं ते?असो.
नमनाला सांगायचं तर कदाचित माझ्या बाबांमुळे माझ्या रक्तात हे आलं असावं..जेव्हापासून पुस्तकं वाचायला लागले तेव्हापासून व्यंकटेश माडगुळकरांचं लिखाण आणि तेही त्यातलं जंगलाचं वर्णन वाचून भारावल्यासारखं व्हायचं. मारूती चित्तमपल्लीबरोबर आपणंच पक्षी पाहातोय असं वाटायचं. कधी हे स्वतःही करू असं वाटलं नाही पण मला वाटतं बहुतेक ९८ साली ठाण्याला पक्षिमित्रसंमेलन भरलं आणि मैत्रीणीबरोबर त्याला गेले. तिथे बी.एन.एच.एस.ची माहिती कळली आणि शेवटी ते मला मिळेपर्यंत म्हणजे साधारण १९९९ साली जंगल भटकंती, थोडंफ़ार पक्षिनिरीक्षणाचा खर्या अर्थाने नाद लागला.
त्यानंतर भारतात असेपर्यंत म्हणजे २००३ पर्यंत त्या भटक्या मंडळींबरोबर जमेल (आणि आर्थिकदृष्ट्या परवडेल) तेवढी बरीच भटकंती केली.कुठेच जायला नसलं म्हणजे आपलं हक्काचं बोरीवलीचं नॅशनल पार्क, त्यात एवढ्या वेगवेगळ्या आतल्या ठिकाणी गेलो, एकदा फ़ॉरेस्ट ऑफ़िसरसमोर उठाबशाही काढल्यात. ते मंतरलेले दिवस पुन्हा येणं अशक्यच आहे पण त्यांच्या आठवणीत रमण्यासारखं दुसरं सुख नाही. तेव्हा कॅमेराही नव्हता आणि जो तो त्यांचे फ़ोटो काढी त्यातले नेहमीच मागायला कसंतरी वाटे शिवाय त्यांचा डिजीटल कॅमेराही नसे त्यामुळे जे काही आहे ते सर्व फ़क्त काही आठवणींच्याच कॅमेर्यात कैद. सगळं तसच्या तसं नाही पण बरचसं आठवेल या अपेक्षेने हा पुनश्च: श्रीगणेशा.